येणाऱ्या काळामध्ये केवळ चीनमध्येच दुष्काळस्थिती निर्माण होणार आहे असं नाही, तर याचा परिणाम आशिया आणि युरोप खंडांतील अनेक देशांवर पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
चीनमध्ये उत्पादनाला फटका
जोरदार पाऊस आणि पुराचा चीनला मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे चीनमधल्या शेतीचे उत्पादन अतिशय कमी झालेले आहे. या आधी आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळेसुद्धा चिनी अन्नधान्याचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे आता चीनला जनतेला अन्नधान्य पुरवठा करताना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची आयात करावी लागेल. अशा स्थितीत जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या खासकरून गहू आणि तांदळाच्या किमती वाढतील.
युरोप, अमेरिकेतही दुष्काळ
केवळ चीनच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मान्सून आणि पावसाचा कालावधी बदलत आहे. युरोपमध्येही अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. अशी परिस्थिती 500 वर्षांमध्ये कधीच निर्माण झाली नव्हती. आफ्रिका खंडातही मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. अमेरिका तसेच मॅक्सिकोमधील अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेले गव्हाचे भाव, निम्म्यावर आलेली भारतीय अन्न महामंडळाची गहू खरेदी आणि सहा वर्षांतील नीचांकी गहू उत्पादन यामुळे देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे, म्हणून केंद्र सरकारने गहू निर्यातीवर तत्काळ बंदी घातली. आताच अजून एक घोषणा करण्यात आली आणि सरकारने गव्हाच्या पिठाची निर्यात आणि गव्हाच्या इतर कुठल्याही बायप्रोडक्टची निर्यात बंद करण्यात आली आहे. कारण, जागतिक दुष्काळामुळे गहू आणि त्यांचे इतर बायप्रोडक्ट यांची किंमत येणाऱ्या काळामध्ये पुष्कळ वाढू शकते.
युरोप-अमेरिकेतील दुष्काळ आणि भारत
युरोप, अमेरिकेमधील उष्णतेच्या लाटेमुळे अन्न संकट निर्माण झाले आहे. हे सगळे देश यापुढे अन्न बाहेरून आयात करतील, पण त्यांना अन्नधान्य कोण देईल? रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. चीनमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी संकट आणि अन्न संकट निर्माण झालेले आहे. याचाच अर्थ जगामध्ये अन्नधान्य निर्यात करणारे कुठलेही मोठे देश राहिलेले नाहीत.
आज तीन ते चार कोटी भारतीय हे अमेरिका आणि युरोपमध्ये वसले आहेत. युरोपमध्ये आलेल्या आर्थिक संकटामुळे त्यांच्या बजेटवरती आणि जीवनावर, राहणीवर फरक पडेल. याआधी यूरोप आणि अमेरिकेमध्ये अनेक भारतीय आपल्या नातेवाईकांकरता भारतात पैसा पाठवायचे, त्यात नक्कीच कमी होईल. याशिवाय तीन ते चार कोटी भारतीय प्रत्येक वर्षी युरोप आणि अमेरिकेच्या पर्यटनाकरिता जातात. ते पर्यटन आता बंद पडेल. कारण, अमेरिका, युरोपमध्ये राहण्याचा आणि तिथे विमानाने जाण्याची किंमत 25-30 टक्के वाढली आहे.
याशिवाय येणाऱ्या हिवाळ्यामध्ये युरोपमध्ये ऊर्जा संकट निर्माण होणार आहे. ज्यामुळे अतिथंड हवामानाच्या वेळेलासुद्धा तिथे “सेंट्रल हिटिंग’ची व्यवस्था नसेल. त्यामुळे भारतातून बहुतेक पर्यटक युरोप आणि अमेरिकेला जाणार नाही. याशिवाय लाखो विद्यार्थी शिक्षणाकरता या दोन्ही महाखंडात जातात. आता नवीन विद्यार्थी या ठिकाणी जाणार नाहीत. कारण, शिक्षणाचा खर्च 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेला आहे. परंतु ज्यांचे शिक्षण पूर्ण झालेले नाही, त्यांना मात्र युरोपमध्येच राहावे लागेल व त्यांचा शिकण्याचा खर्च 20 ते 25 टक्क्यांनी वाढणार आहे. युरोप आणि अमेरिका जागतिक व्यापारामध्ये भारताचे मोठे भागीदार आहेत. येणाऱ्या आर्थिक संकटामुळे भारत आणि युरोपचा व्यापार कमी होऊ शकतो.
परिस्थितीचा भारताने फायदा घ्यावा
जास्त महत्त्वाचे हे आहे की, युरोप आणि अमेरिकेमधील दुष्काळ परिस्थितीवर भारत कशा प्रकारे मात करतो. या परिस्थितीचा भारताने आपला फायदा करून घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, पर्यटनाकरता आता भारत एक चांगले स्थान किंवा देश म्हणून पुढे येऊ शकतो. याशिवाय मेडिकल टुरिझमकरता सुद्धा आपण अमेरिका आणि युरोपमधल्या पेशंटला भारतामध्ये आणू शकतो.
हे दोन्ही महाखंड चीनकडून मोठ्या प्रमाणात वस्तू आयात करतात. आता भारत हा चीनची जागा घेऊ शकतो. कारण, जगामध्ये चीनविषयी राग आहे. भारत हा युरोप आणि अमेरिकेला इंधन समस्यांमध्ये मदत करू शकतो. रशियाकडून मिळणारे स्वस्त कच्चे तेल आपण आपल्या कारखान्यांमध्ये शुद्ध करून ते पेट्रोल आणि डीझेलच्या रूपात या दोन्ही महाखंडांना निर्यात करू शकतो. ही निर्यात सध्याही सुरू आहे. मात्र त्यामध्ये आपण पुष्कळ जास्त वाढ करू शकतो.
या सर्व पार्श्वभूमीवर भारताचा विचार करायचा झाल्यास, यावेळेस भारतात झालेला पावसाळा अत्यंत समाधानकारक होता. मात्र काही भागात उष्णतेची लाट आल्यामुळे गव्हाचे उत्पादन तीन टक्के कमी होईल, असे म्हटले जाते. मात्र बहुतेक सगळ्या पिकांचे या वेळेला रेकॉर्ड उत्पादन होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताला अन्नधान्य बाहेरून आयात करण्याची वेळ येणार नाही. मात्र, खाद्यतेलासारखे आणि काही धान्ये आयात करावी लागू शकतील. शक्य झाले तर त्याचेसुद्धा उत्पादन भारतात केले तर भारत अन्नधान्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण होऊ शकतो आणि जागतिक उष्णता लाटेमुळे निर्माण होणाऱ्या अन्न संकटाचा सामना करू शकतो.
ग्लोबल वॉर्मिंग आणि उपाययोजना
इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या 2021 च्या अहवालानुसार जागतिक तपामानवाढीमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. ज्यापद्धतीने उष्णता वाढणार त्यानुसार लोकांना उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळाचा सामना करावा लागणार. जागतिक सरासरी तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास भारतीय उपखंडाला याचा सर्वात मोठा फटका बसणार असून भारत, पाकिस्तान, बांगलादेश आदी देश उष्णतेच्या लाटांनी होरपळून निघण्याची भीतीही आयपीसीसीच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. तापमानवाढ न रोखल्यास अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण होऊन त्यांच्या किमती वाढणे, अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणे, नद्या आटून पाण्याची टंचाई निर्माण होणे, महागाई वाढणे व परिणामी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन प्रचंड प्रमाणात गरिबी वाढणे आणि लोकसंख्येची मोठी स्थलांतरे होणे, आदी धोके वर्तवण्यात आले आहेत. कर्कवृत्ताच्या जवळ असलेल्या भारतातील कोलकाता व पाकिस्तानमधील कराची या प्रमुख शहरांसह आसपासच्या प्रदेशाला उष्णतेच्या लाटांचा मोठा फटका बसणार आहे. म्हणून ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्याकरता तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.