वृत्तपत्रांवर नियंत्रण लादण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही
नवी दिल्ली, दि. 31 – वृत्तपत्रावर नियंत्रण लादण्याचा केंद्र सरकारचा बिलकुल विचार नाही, असा खुलासा पंतप्रधान इंदिरा गांधींनी कैरोच्या पत्रकारांजवळ केला. सध्याची प्रसिद्धीपूर्व तपासणी ही तात्पुरत्या उपाययोजना आहे. सध्या काही नियंत्रणे भाषण व लेखन स्वातंत्र्यावर घालण्यात आली आहेत; परंतु हे तात्पुरते नियंत्रण आहे.
जेव्हा विरोधी पक्षाच्या आघाडीचे नेते जबाबदारीने वर्तन करू लागतील तेव्हा ही नियंत्रणे आम्ही उठवू. बड्या वृत्तपत्रांची मालकी व वृत्तपत्र स्वातंत्र्य यांची फारकत करण्याचा प्रश्न आपल्या पुढे आहे. परंतु सरकार वृत्तपत्रांवर स्वतःचे नियंत्रण लादू इच्छीत नाही.
भारतीय तंत्रज्ञांना जगात मागणी
पुणे – हल्लीच्या शिक्षणात काही दोष असतीलही परंतु जगामध्ये जर कुठे तंत्रज्ञ माणसे हवी असतील तर यासंबंधीची मागणी भारताकडे केली जाते. याचा आपल्या देशाला अभिमान आहे, असे सांगून भारताच्या कृषी व पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे म्हणाले, यापुढे शिक्षणाचा विस्तार न थांबविता त्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज आहे. आमचे शिक्षण फारच पुस्तकी आहे. शिकलेल्यांना शारीरिक काम करणे कमीपणाचे वाटते.
ही परिस्थिती बदलली पाहिजे. शिक्षण हे गरिबी दूर करण्याचे साधन कसे होईल याची चर्चा करून त्याप्रमाणे शिक्षण दिले गेले पाहिजे. जितके वाचावे तेवढे आपणास अधिक कळायला लागते आणि किती पुढे जायचे आहे याची जाणीव होते.