मुंबई : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मतभेत असल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या विरोधी भूमिका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, सोबतच अजित पवार यांनी देखील घेतली होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिंदे गटाने या भेटीवरून उद्धव ठाकरे यांच्यवर निशाणा साधला आहे.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “लाचारांची स्वारी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी”, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला. तसेच आडनावाचा वारसा आला, पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला. कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला. पक्ष गेला, चिन्हही गेलं आणि आता स्वाभिमानही गेला, अशी टीकाही त्यांनी केली.
लाचारांची स्वारी सिल्व्हर ओक च्या दारी…
आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला… कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला…
पक्ष गेले, चिन्ह गेले…आणि आता स्वाभिमानही गेला… pic.twitter.com/AOP5HW5nSQ— sheetal mhatre (@sheetalmhatre1) April 11, 2023
दरम्यान, या भेटीवरून शिंदे गटाचे आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही ठाकरे गटाला लक्ष्य केले. संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते. त्यानंतर अदाणींच्याबाबतीत शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेले वक्तव्य सर्वांनीच बघितले आहे. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही म्हणून त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असावी, असा टोला त्यांनी लगावला.