BAN W vs IND W 2nd T20I : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे, जिथे तो यजमान संघासोबत पाच सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मंगळवारी खेळल्या गेलेल्या अन् पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS Method) 19 धावांनी पराभव केला.
भारताच्या विजयात डावखुरी फिरकीपटू राधा यादव आणि डी हेमलता यांचे महत्त्वाचे योगदान होते. या विजयानंतर पाहुण्या भारतीय संघाने आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेशचा 44 धावांनी पराभव केला होता.
For her explosive unbeaten knock of 41*(24), Dayalan Hemalatha receives the Player of the Match award 🏆👏
Scorecard ▶️ https://t.co/zNNKipwiPm#TeamIndia | #BANvIND pic.twitter.com/IVwaER7DS5
— BCCI Women (@BCCIWomen) April 30, 2024
बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यात बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघाने प्रथम गोलंदाजी करत बांगलादेशचा संघ अवघ्या 119 धावांत ऑलआऊट केला. बांगलादेशकडून मुर्शिदा खातूनने सर्वाधिक 46 धावा केल्या, तर दिलारा अख्तरने 10 आणि शोबाना मोस्तरीने 19 धावा केल्या. याशिवाय बांगलादेश महिला संघाच्या एकाही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दुसरीकडे, भारतीय महिला संघाकडून राधा यादवने अप्रतिम गोलंदाजी करत 3 बळी घेतले, तर दीप्ती शर्मा आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी दोन आणि पूजा वस्त्राकरने एक बळी घेतला.
विजयासाठी 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय महिला संघाला पहिल्याच षटकात शेफाली वर्माच्या रूपाने मोठा धक्का बसला. शेफाली शून्यावर बाद झाली, मात्र त्यानंतर स्मृती मानधना आणि दयालन हेमलता यांनी मिळून संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र पावसामुळे सामना अर्ध्यावरच थांबवावा लागला. या कालावधीत केवळ 5.2 षटके खेळली गेली आणि त्यावेळी भारताची धावसंख्या एक विकेट गमावून 47 धावा झाली होती. बराच वेळ होऊनही पाऊस थांबत नसल्याने पंचांनी डीएलएस नियमानुसार भारतीय संघाला विजेता घोषित केले. यादरम्यान स्मृती मानधना 5* आणि दयालन हेमलता 41* धावा करून नाबाद राहिली. आता भारतीय महिला संघ गुरुवार, 2 मे रोजी बांगलादेशविरुद्ध आपला पुढील व तिसरा सामना खेळणार आहे.