सांगली – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील पहिल्या चार करोनाबाधितांसह 14 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 24 वरुन आता 21 इतकी झाली आहे. दरम्यान, पहिल्या चार करोनाबाधितांचा 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला होता. त्यामुळे दुसऱ्यांदाचा त्यांचा अहवाल तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरा हे अहवाल प्राप्त झाले. दरम्यान, पहिल्या चार करोनाबाधितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे.
इस्लामपूर येथील चार जण सौदी अरेबिया येथून 14 मार्च रोजी भारतात परतले होते. त्यानंतर या चौघांना इस्लामपूर येथे होम क्वरंटाईन करण्यात आले होते. परंतु होम क्वरंटाईनचे भंग केल्याने त्यांना 19 मार्च रोजी प्रशासनाने मिरजेतील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्यानंतर या चौघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. 14 ते 19 मार्च
दरम्यान त्या चार जणांच्या संपर्कात सुमारे 350 हून अधिक जण आल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेली होती. तातडीने या सर्वांचा शोध घेऊन यातील संशयित आणि जवळच्या संपर्कात असणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेण्यात येवून त्यांचे होम आणि संस्था क्वरंटाइन करण्यात आले होते. यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांच्या कुटुंबातील 25 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील एक महिलेचा तर दोन वर्षांच्या बाळासह एका लहान मुलीचा समावेश होता. त्यामुळे राज्य सरकारसुद्धा हादरुन गेले होते. या सर्व 25 जणांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात करोना सेंटरची स्थापना केली होती. जिल्ह्यात पहिल्या चार करोनाबाधितांमुळे इस्लामपूरमध्ये त्यांच्या कुटुंबातील सर्वांना करोनाची लागण झाली होती.