भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात करोना नामक प्राणघातक विषाणूने धुमाकूळ माजवला असतानाच भारतात त्याच प्रमाणात पसरू पाहणाऱ्या अफवांच्या विषाणूने पाय पसरायला सुरुवात केल्याने त्यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षी एक एप्रिलला एप्रिल फुलच्या परंपरेतून एकमेकांना फसवण्याच्या मनोरंजनात्मक गोष्टीला यावर्षी ब्रेक लागला असला तरी गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या घटना पाहता लोकांना विनाकारण फसवण्यासाठी काही समाजकंटकांना 1 एप्रिल या तारखेची गरज आहे, असे वाटत नाही.
करोनासारखी भीषण परिस्थिती सभोवताली असतानाही अफवांचा बाजार उठवून समाजात विनाकारण घबराट माजवण्यात या समाजकंटकांना कोणता विकृत आनंद मिळतो हेच कळत नाही. एप्रिल फुलच्या नावाखाली फसवणूक करताना किमान कोणाला दुखावण्याचा किंवा हानी पोहोचवण्याचा हेतू नसतो; पण विनाकारण अफवांचा बाजार उठवणारे मात्र अनेकांना हानी पोहोचवत असतात. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटल्यामुळे 22 हजार पेक्षा जास्त महिलांना वैधव्य प्राप्त होणार असल्याची एक अफवा दोन दिवसांपूर्वी राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरली होती.
यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे नंतर लक्षात आले. मुंबईच्या एका उपनगरात रस्त्यावर पार्क करण्यात आलेली एक मोटार अचानक पेटली असताना त्या भागात जाळपोळ सुरू झाल्याची अफवा कोणीतरी पसरवली आणि केवळ घबराटीतून त्या भागात प्रचंड गर्दी निर्माण झाली. सर्व प्रशासकीय यंत्रणा करोना व्हायरसविरुद्धच्या युद्धामध्ये व्यग्र असताना अशा प्रकारच्या अफवांना तोंड देण्याचे कामही पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांना करावे लागत आहे.
अर्थात, अशा अफवा पसरवण्यात समाज माध्यमंही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत, हेही मान्य करावे लागेल. आपल्या हातातील स्मार्टफोनवर असणाऱ्या सोशल माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर येणारी माहिती न तपासून ती फॉरवर्ड करण्याची वृत्ती वाढीस लागल्यामुळे हा अफवांचा बाजार जास्त बोकाळला आहे. महालक्ष्मीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटणे किंवा दंगल पेटणे यासारख्या अफवांच्या जोडीनं करोना व्हायरस संदर्भातल्याही अफवांचा जोर गेल्या काही दिवसांत वाढला आहे. त्यातूनच आपल्या आसपास एखादा करोना संशयित असला तर त्याला आपल्या सोसायटीत, इमारतीत किंवा घरात प्रवेश न देणे, त्याला मारहाण करणे असे प्रकार घडू लागले आहेत.
त्याच्या जोडीला करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणती औषधे कशी वापरावीत याबाबत माहिती देणाऱ्या अफवांचाही जोर सध्या वाढला आहे. या काळात काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत विविध प्रकारची माहिती सध्या सोशल माध्यमांवर उपलब्ध आहे. या माहितीमध्ये कितपत तथ्य आहे याचा कोणताही विचार न करता ही माहिती विविध सोशल माध्यमांच्या गटांवर फॉरवर्ड केली जाते. अशा प्रकारची माहिती आरोग्याला हानिकारक ठरू शकते, याचा कोणताही विचार माहिती फॉरवर्ड करणारा करत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील जनता लॉकडाउनला प्रतिसाद देऊन घरात बसली असली तरी घरात बसल्याबसल्या हा अफवांचा बाजार आपल्या माध्यमातून वाढणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. अर्थात, याबाबत प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांनी आधीच काळजी घेतली आहे. एक एप्रिलला ज्याप्रमाणे एप्रिल फूलचे करोनाबाबतचे मेसेज पाठवण्यावर बंधने घालण्यात आली होती त्याचप्रमाणे तथाकथित दंगल आणि कोणत्याही प्रकारचे चुकीचे धार्मिक मेसेज पाठवण्यावरही येत्या काही कालावधीत बंधने घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला काल रात्री नऊ वाजता देशातील कोट्यवधी लोकांनी घरातील दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावून एकतेचा संदेश दिला असला तरी पंतप्रधानांच्या आवाहनानंतर विविध प्रकारच्या अफवांचा बाजार निर्माण झाला होता. एकाच वेळी कोट्यवधी दिवे लावण्यामुळे करोना विषाणू मरू शकतो किंवा निष्प्रभ होतो असा संदेश देणाऱ्याही काही अफवा होत्या. नरेंद्र मोदी यांचा हेतू या आवाहनामागे वेगळा असला तरी त्या आवाहनाचा चुकीचा आणि वेगळाच अर्थ घेऊन अनेकांनी जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला हे तथ्य आहे.
नजीकचा कालावधी अधिकच महत्त्वाचा असल्याने या काळात अफवांचा बाजार अधिकच पसरणार नाही याची काळजी सर्व स्तरावरच घेण्याची गरज आहे. या एप्रिल महिन्यात विविध प्रकारचे धार्मिक उत्सव, सण आणि महापुरुषांच्या जयंत्या असे विविध कार्यक्रम आहेत. अफवांचे पीक पिकवून विनाकारण समाजात तेढ निर्माण करणारे समाजकंटक अशा संधीची वाट बघत असतात हे लक्षात घेऊनच सरकारी यंत्रणांना आता सतर्क राहावे लागेल. करोना विषाणू विरुद्ध युद्ध लढत असताना इतर कोणत्याही अनावश्यक गोष्टीकडे यंत्रणांचे लक्ष वेधले जाऊ नये यासाठी सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे.
सुदैवाने लॉकडाउन परिस्थितीमुळे घरातील सर्वजण एकत्रच आहेत. कोण काय करतोय याची माहिती एकमेकांना आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने जर आपल्या पातळीवर कोणत्याही प्रकारची चुकीची आणि वाईट माहिती प्रसारित होणार नाही अशी खबरदारी घेतली तर अफवा पसरणार नाहीत. सध्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना परीक्षांच्या तारखांबाबत काळजी आणि उत्सुकता आहे, याबाबतची चुकीची माहितीही पसरवली जाण्याचा धोका लक्षात घ्यायला हवा.
त्यामुळे अशा कोणत्याही माहितीची शाहनिशा अधिकृत सूत्रांकडून घेण्याची सवय पालकांनी लावून घ्यायला हवी. कोणत्याही अफवेच्या नादी लागून करोनाचे संकट अधिकच गंभीर होणार नाही याची दक्षता समाजातील सर्वच घटकांना येत्या कालावधीत घ्यावी लागेल. या कालावधीमध्ये सरकारची सायबर यंत्रणा अधिक सतर्क आणि कार्यक्षम झाली असली तरीही नागरिकांनी स्वतःहूनच दक्षता घेतली तर अफवांचा विषाणू पसरणार नाही आणि सामाजिक हानी होणार नाही. सरकार आणि सरकारच्या सर्व यंत्रणा यांच्यासाठी सध्या करोनाशी मुकाबला करणे हीच प्राधान्याची बाब आहे हे कोणालाही विसरून चालणार नाही.