बसप प्रमुख मायावतींचा केंद्र सरकारला दिला इशारा
नवी दिल्ली : नागरिकत्व संशोधन कायद्यावरुन सध्या देशात रान पेटले आहे. त्यात काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मार्च काढून या कायद्याला विरोध दर्शवला. आता त्यांच्या नंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीदेखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मायावती यांनी नागरिकत्व कायदा घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, मी केंद्र सरकारकडे हा घटनाबाह्य कायदा मागे घ्यावा अशी मागणी करते, अन्यथा भविष्यात त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.’, असे मायावती यांनी सांगितले.
मायावती यांनी कायद्याचा विरोध करताना, सरकारने आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करू नये. तसंच, बहुजन समाज पक्षाच्या संसदीय मंडळाने राष्ट्रपतींना भेटीसाठी वेळ मागितली आहे. आमच्या पक्षानेही नागरिकत्व कायद्याविरूद्ध आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात उत्तर प्रदेश विधानसभेत आवाज उठवला आहे, असे मायावती यांनी सांगितले.
दरम्यान, याआधी सोमवारी मायावती यांनी ट्विट करत अलिगढ आणि जामिया हिंसाचार प्रकरणावर दु:ख व्यक्त केले होते. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले होते की, नवीन नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात झालेल्या हिंसाचारामध्ये आधी उत्तर प्रदेशचे अलिगढ आणि नंतर जामिया विदयापीठामध्ये अनेक निरपराध विद्यार्थी आणि लोकांचा बळी गेला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून पक्ष पीडितांसोबत आहे.