पुणे – राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेच्या बनावट गुणपत्रिका सादर करून प्रवेश घेणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तंत्रशिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागातून (पुम्बा ) व इंदिरा इन्स्टिटयूटमध्ये “एमबीए’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतेवेळी पाच विद्यार्थ्यानी राष्ट्रीय पातळीवरील “एटीएमए’ या प्रवेश परीक्षेची बनावट गुणपत्रिका सादर केली. या विद्यार्थ्यानी या प्रवेश परीक्षेची बनावट गुणपत्रिका सादर केल्याचे असोसिएशन ऑफ इंडिया मॅनेजमेंट स्कूलने केलेल्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने म्हटले आहे.
परप्रांतीय विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे या पाच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी “मनविसे’चे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.