शिसे, निकेलसह जड धातूंचे प्रमाण सर्वाधिक
केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल
आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका
पुणे – भारतातील जलस्रोतांमध्ये पाणी दूषित करणाऱ्या जड धातूंचे प्रमाण सर्वाधिक असून, देशातील एकूण जलस्रोतांपैकी तब्बल 62 टक्के जलस्रोत हे जड धातूंमुळे प्रदूषित झाले असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय जल आयोगातर्फे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली असून, अशाप्रकारच्या प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
केंद्रीय जल आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता पडताळणी प्रक्रिया अहवालाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या अहवालात देशभरातील नद्यांवर उभारण्यात आलेल्या 442 गुणवत्ता पडताळणी केंद्रापैकी 287 केंद्रांमधील पाण्याच्या नमुन्यांमध्ये जड धातूंचे प्रमाण धोकादायकरित्या वाढले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जड धातूंमध्ये शिसे धातूचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यापाठोपाठ निकेल, कॅडमियम, क्रोमियम, आणि कॉपर या धातूंचे प्रमाणदेखील मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. प्रक्रिया न करता थेट नदीत सोडल्या जाणारे सांडपाणी, पावसाच्या पाण्याद्वारे वाहत आलेली रासायनिक खते यांमुळे पाण्यातील जड धातूंचे प्रमाण गंभीर स्वरूपात वाढले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत पाहणी करण्यात आलेल्या नद्यांपैकी गंगा, यमुना आणि गोदावरीतील पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि नंतर असे हे नमुने गोळा करण्यात आले. या तीन नद्यांव्यतिरिक्त इतरही नद्यांचे काही नमुने गोळा करून त्यांची गुणवत्ता पडताळणी करण्यात आली. देशभरातील 442 केंद्रांवरून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 287 नमुन्यांमध्ये जड धातूंचे प्रमाण धोकादायकरित्या वाढले असल्याचे आढळून आले आहे. मुख्यत: उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये या धातूंचे प्रमाण वाढत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जड धातूंमुळे उद्भवणारे आजार
जड धातूंचे प्रमाण अधिक असणारे पाणी जास्त काळ ग्रहण केल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. यामध्ये शारीरिक क्षमता कमी होणे, मज्जातंतूचे विकार, मेंदूचे विकार, पार्किन्सन यासारखे आजार होण्याचा सर्वाधिक धोका असतो. लवकर निदान आणि योग्य उपचार न झाल्यास अशाप्रकारच्या रोगामुळे व्यक्तीचा मृत्युदेखील होऊ शकतो, असेदेखील या अहवालात म्हटले आहे.