– संदीप घिसे
पिंपरी – रात्रपाळीवर गेलेल्या पतीने पत्नीला फोन लावला. मात्र फोनचे क्रॉस कनेक्शन लागले. एकाचवेळी पत्नीसोबत अन्य एक पुरूषही फोनमध्ये बोलत होता. एवढ्या रात्री आपल्या घरी कोण, हे पाहण्यासाठी पती थेट घरी आला. मात्र घरी पत्नी आणि लहान मुलांशिवाय कोणीही नव्हते. तेव्हापासून पती-पत्नी यांच्या संसारात संशयकल्लोळ निर्माण झाला. प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत गेले. मात्र समुपदेशकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे त्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर आली.
दीपक आणि दीपा यांचा 2016 मध्ये विवाह झाला. लग्नानंतरचे काही दिवस छान मजेत गेले. त्यांच्या संसारवेलीवर एक फुलही उमलले. मुलाच्या संगोपनात व्यस्त झालेल्या दीपाचे आपल्या पतीकडे दुर्लक्ष झाले. यामुळे पतीच्या मनात नको ते विचार येऊ लागले. पत्नी आपल्यावर पहिल्याप्रमाणे प्रेम का करीत नाही, असा प्रश्न त्याला पडला.
त्यातच एकदिवस रात्रपाळीवर गेलेल्या दीपकने आपल्या पत्नीला फोन लावला. मात्र त्यावेळी नेमके क्रॉस कनेक्शन झाले. दीपक आणि दीपा यांच्या संभाषणात तिसरीच व्यक्ती कोणीतरी बोलत होती. दीपाला वाटले की तो दीपकचा कामावरील मित्र आपली गंमत करीत असेल. तर दुसरीकडे आपल्या घरात एवढ्या रात्री कोण पुरूष आहे, असा प्रश्न दीपकला पडला.
पती कंपनीतून अवघ्या दहा मिनिटांमध्ये घरी पोचला तेव्ही दीपा घरात एकटीच बाळासोबत होती. मात्र तेव्हापासून दीपकच्या मनात पत्नीबाबत शंका निर्माण झाली. यामुळेच आपली पत्नी आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची पक्की खात्री त्याला वाटू लागली. एकेकाळी सुखाने सुरू असलेल्या संसारात भांडणे होऊ लागली. दोघेही माघार घेण्यास तयार नव्हते. अखेर दीपाने अखेरचा प्रयत्न म्हणून पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडे अर्ज केला.
उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांनी दीपक, दीपा आणि त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड आणि अनिता जाधव यांनी सर्वांचे जबाब लिहून घेतले. हे जबाब वाचून नेमके कोणाचे कुठे कुठे चुकते आहे, याचा सखोल अभ्यास समुपदेशक वंदना जगताप यांनी केला आणि समुपदेशनाला सुरवात केली. त्यांच्यातील एक एक गैरसमज दूर करण्याचे करण्यात पोलीस कर्मचारी प्रदीप वासाळे यांनी महत्वाची भूमिका बजावली. दीपक आणि दीपामधील संशयकल्लोळ दूर झाला. मात्र त्याचवेळी दीपाच्या आई-वडिलांना मुलीच्या संसारात हस्तक्षेप करू नका, असे स्पष्टपणे पोलिसांनी बजावले. आता वर्ष झाले त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.
डोळे आणि कान यात चार बोटाचे अंतर असते. यामुळे आपण जे ऐकतो ते नेहमी खरेच असते असे नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्याने जे पाहतो त्यालाही महत्व दिले पाहिजे. अनेकदा पती पत्नीमध्ये वाद निर्माण करण्यासाठी अनेकजण कान भरतात. कान भरणाऱ्या अशा लोकांना आपण जाणीवपूर्वक चार हात दूर ठेवले पाहिजे. मग ते लोक आपल्या नात्यातील का असेना. पती पत्नीच्या नात्यात विश्वास महत्वाचा असतो. जर विश्वास उडाला तर संसाराची राख रांगोळी होण्यास वेळ लागत नाही. पती-पत्नीच्या नात्यात क्रॉस कनेक्शनने संशयकल्लोळ निर्माण केला होता. त्यांचा संसार तुटता तुटता वाचला.