दिग्गज अभिनेते अरुण गोविल हे रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारत घरांघरात पोचले आणि लोकप्रिय झाले. अरुण गोविल यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ही लोकांना खूपच भावली होती. श्रीरामाच्या भूमिकेत अरुण गोविल हे परफेक्ट चॉइस वाटतात. परंतु श्रीरामाच्या भूमिकेचे ऑडिशन दिल्यानंतर ते रिजेक्ट झाले होते, हे ठाउक आहे काय. एका मुलाखतीत अरुण गोविल यांनी नाकारण्याचा प्रसंग सांगितला. गोविल यांच्याच शब्दात जाणून घेऊ.
ते म्हणतात, “” मी रामानंद सागर यांच्या विक्रम आणि वेताळ मालिकेसाठी काम करत होतो. यादरम्यान मला रामायण मालिका सुरू होणार असल्याचे समजले. श्रीरामाची भूमिका करावी असे मला वाटू लागले. ही बाब मी रामानंद सागर यांच्या कानावर घातली. तेव्हा त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावले. पण ऑडिशनमध्ये मी रिजेक्ट झालो. अन्य अभिनेत्यास श्रीरामाची भूमिका देण्यात आली. शूटिंगच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या. पण एकदिवस अचानक मला रामानंद सागर यांनी भेटण्यासाठी बोलावले. ते म्हणाले की, तुला रामाच्या भूमिकेसाठी निवडले आहे. माझी देखील अशीच इच्छा आहे, असे सागर म्हणाले”.
याप्रमाणे श्रीरामाच्या भूमिकेसाठी अरुण गोविल यांची निवड झाली. रामायण मालिकेनंतर अरुण गोविल यांनी अनेक चित्रपट, मालिका, शोजमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. परंतु श्रोत्यांच्या मनातून त्यांनी साकारलेली रामाची भूमिका गेली नाही. त्यामुळे लोकांनी अन्य भूमिकेत त्यांना स्वीकारले नाही. अरुण गोविल यांनी रामायण, विक्रम वेताळ व्यतिरिक्त टीव्ही शो बसेरा, एहसास, कहानी एक घर की, कैसे कहू, अपराजिता, अंतरा, सांझी या मालिकांत काम केले.