राज्यासह देशातील करोनाचे रुग्ण झपाट्याने कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याच पार्श्ववभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच १ एप्रिल पासून देश निर्बंधमुक्त करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता यावरून राज्यातही ते आदेश लागू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वपूर्ण माहिती दिली.
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी “नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी देण्यात अली असल्याचे म्हटले आहे. राज्यात निर्बंध हळहळू शिथील करत आहे, सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा, डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे राजेश टोपे म्हणाले.
तसेच गुढीपाडव्याबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून निर्णय घेतील असेही टोपे म्हणाले. तसेच मिरवणुकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेण्यात येणार आहे. शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असा मला विश्वास असून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असे टोपे म्हणाले.
मास्कमुक्तीचे धाडस सध्या तरी केलेले नाही, सावर्जनिक ठिकाणी मिास्क वापरा, परदेशातील स्थिती पाहता मास्क वापरणं गरजेचं आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून निर्बंध लावण्यात आले होते. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचेही टोपे यांनी यावेळी म्हटले.
रेल्वेमधील निर्बंध लसीकरण वाढावं म्हणून कायम ठेवले आहे. रेल्वे, बस, मॉलमधील शिथीलकरणाबाबत टास्क फोर्सची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार सल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. तसेच परदेशात करोनाचा धोका वाढतोय, ज्या नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांनी घ्यावी, असे टोपे यावेळी म्हणाले.
राज्यात करोनाची आकडेवारी पाहता, गेल्या 24 तासांत करोनाचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, यादरम्यान, एकही मृत्यू झालेला नाही. या दरम्यान 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 960 वर पोहोचली आहे. तसेच, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर आतापर्यंत मुंबईतील करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा वाढून 1,057,915 वर पोहोचला आहे.