पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती मतदार संघात येणाऱ्या भोर, वेल्हा आणि मुळशी या तीन तालुक्यांत एकूण ३० गावांत अजूनही संपर्कासाठी मोबाइलचे नेटवर्क नाही. त्यामुळे या दुर्गम भागातील ३० मतदान केंद्रांवर प्रभावी संपर्क यंत्रणा राबविली जाणार आहे, या अंतर्गत वायरलेस पोलीस यांची मदत घेतली जाणार आहे.
माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी रायडर्सची नियुक्ती केली जाणार आहे. जेणेकरून प्रत्येक दोन तासांनी मतदानाची आकडेवारीची माहिती जिल्हास्तरावर पोहचविणे शक्य होणार आहे. तसेच, मतदान दरम्यान काही अडचणी आल्यास त्या सोडविणे शक्य होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले की, भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संदेशवाहक (रायडर) नेमण्यात आले आहे. त्यासोबत स्थानिक पातळीवर कार्यरत ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आदींची मदत घेतली जाणार आहे.
मतदानाच्या दिवशी तांत्रिक अडचण असल्यास तत्काळ वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन स्थानिक पातळीवर ती दूर केली जाईल. मतदान केंद्राबाबत प्रत्येक दोन तासांनी माहिती प्राप्त होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक मतदान केंद्रांवरील दोन तासांत किती मतदान झाले याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत निवडणुकाकडे पाठविली जाते. त्यासाठी संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. यासाठी भोर प्रांताधिकारी यांनी प्रभावी संपर्क आराखडा तयार केला आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा प्रशासनाकडील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील सॅटेलाइट फोनचा सुद्धा वापर केला जाणार आहे.