पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखने वाहन चोरीचे दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या चोरट्यांची माहिती एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या गुन्हेगारांवर नियमित वॉच ठेवण्यात येणार आहे,तर दुसरीकडे चोरी झालेल्या वाहनांची माहिती ई- चालान मशीनमध्ये अपडेट करण्यात येत आहे. नाकाबंदीदरम्यान ही वाहने मिळून आली तर मशीनमध्ये अॅलर्ट येईल, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी दिली.
शहरात चालू वर्षातील अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी शहरातून १ कोटी ५१ लाखांची तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत, तर मागील सव्वातीन वर्षांत शहरातून २४ कोटी ६८ लाखांची सहा हजार वाहने चोरीला गेली आहेत. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण जास्त आहे. दिवसाला शहरातून सात ते आठ वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे विशेष मोहीम हाती घेतली आहे.
वाहन चोरी करणारे चोरटे वारंवार एकाच परिसरातून वाहने चोरतात. मात्र, अनेकदा त्यांच्यावर पोलिसांचे मॉनिटरींग कमी पडते. त्यामुळे सध्या गुन्हे शाखेकडून दोनपेक्षा अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल असलेल्या चोरट्यांची माहिती अपडेट केली जात आहे. चोरी झालेल्या वाहनांची माहिती एकत्र करून ई-चलन मशिनमध्ये अपलोड करण्यात येत आहे.
नाकाबंदीवेळी तपासणीदरम्यान त्याचा फायदा होणार आहे. चोरीचे वाहन जर आढळून आले, तर मशिनमध्ये अॅलर्ट येईल. वाहन चोरीच्या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेबरोबरच स्थानिक पोलिसांची पथके घटनास्थळाला तत्काळ भेट देणार आहेत, तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांचा माग काढला जाणार आहे.
चोरीच्या वाहनांची शहराबाहेर विक्री
चोरी केलेली वाहने चोरटे ताबडतोड ग्रामीण भागात नेतात. तेथे अतिशय कमी किमतीत त्याची विक्री केली जाते. कागदपत्रे आणून देतो, अशा थापा मारल्या जातात. अनेकदा खरेदीदाराला माहिती असते वाहन चोरीचे आहे. मात्र, दहा -पंधरा हजारात मिळत असल्याने तो खरेदी करतो.
ही वाहने शहरापासून ३००-४०० किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागात विकली जातात. कधीकधी मौजमजेसाठी वाहनचोरी करण्याची क्रेझ अल्पवयीन मुले आणि तरुणांमध्ये आहे. पेट्रोल संपल्यानंतर ही वाहने रस्त्याकडेला सोडून दिली जातात.
ई- चलन मशीनमध्ये चोरींच्या वाहनांची माहिती अपडेट करण्यात येत आहे. वाहनचोरींला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील.- शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)