मुंबई – अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे टीकेचे धनी बनलेले अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यंदाच्या मोसमात रणजी स्पर्धा खेळणार आहेत. या दोघांनी गेल्या काही महिन्यांपासून फारशी जमाधानकारक कामगिरी केली नसल्याचे दिसत असले तरीही त्यांच्याकडे अफाट गुणवत्ता आहे व ते यंदाच्या मोसमातील रणजी स्पर्धेत सरस कामगिरी करत संघातील स्थान कायम राखतील, असा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान,रणजी स्पर्धेचा यंदाचा मोसम दोन पर्वात खेळवला जाणार असल्याचे सूतोवाच बीसीसीआयने केले होते. यातील पहिले पर्व येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे.
येत्या 15 मार्चपर्यंत साखळी तसेच पात्रता बाद फेरीचे काही सामने या कालावधीत खेळवले जाणार आहेत. त्यानंतर आयपीएल स्पर्धा होणार असून ही स्पर्धा संपल्यावर रणजी स्पर्धेचे दुसरे पर्व 30 मे ते 26 जून या कालावधीत होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.