सोलापूर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आजपासून (शुक्रवार) यजमान महाराष्ट्राचा सामना सौराष्ट्र संघाशी होत आहे. या सामन्यात भारतीय संघातून बाहेर असलेला तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्याच कामगिरीकडेलक्ष राहणार आहे. या सामन्यात त्याने मोठी खेळी केली तरच त्याचा विचार इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी केला जाऊ शकतो.
भरवशाचा फलंदाज लोकेश राहुल व रवींद्र जडेजा दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असून प्रमुख फलंदाज विराट कोहलीही दुसरी कसोटी खेळणार नसल्याने भारतीयसंघ कमकुवत बनला आहे. त्यामुळे उर्वरीत तीन कसोटींसाठी पुजारासारखा तंत्रशुद्ध फलंदाज संघात असणे सार्थ ठरणार आहे. मात्र, पुजाराची यंदाच्या रणजी स्पर्धेतील कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याने त्याला या सामन्यात मोठी खेळी करणे कारकीर्दीसाठी महत्वाचे ठरणार आहे. पुजारा ३६ वर्षांचा असून त्याने आतापर्यंत भारताकडून १०३ कसोटीत ७१९५ धावा केल्या आहेत. पुजाराच्या नावावर १९ शतके आणि ३५ अर्धशतके आहेत.
गेल्या वर्षी जून महिन्यात ओव्हल इथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पुजारा खेळला होता. त्या सामन्यात पुजाराला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे झालेल्या विदर्भविरुद्धच्या लढतीत पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम करणारा पुजारा केवळ चौथा भारतीय खेळाडू आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांच्या यादीत पुजाराने स्थान पटकावले आहे. पुजाराने त्या सामन्यात ४३ आणि ६६ धावांची खेळी केली होती. सौराष्ट्रने त्या लढतीत विजय मिळवला होता.
IND vs ENG Test Series : आणखी 10 षटकार, अन् रोहित शर्मा बनवणार जगातील सर्वात मोठा विक्रम…
सौराष्ट्रचं नेतृत्व जयदेव उनाडकटकडे आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेला उनाडकट हा देशांतर्गत क्रिकेटमधल्या अव्वल गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वातच सौराष्ट्रने दोनवेळा रणजी करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले होते. या लढतीच्या निमित्ताने सोलापुरकरांना पुजारा, उनाडकट या खेळाडूंच्या बरोबरीने शेल्डॉन जॅक्सन, धर्मेंद्रसिंग जडेजा, चिराग जाणी, प्रेरक मंकड, अर्पित वसावदा या सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा खेळ पाहता येणार आहे. महाराष्ट्राच्या संघासाठी हे घरचे मैदान आहे. कर्णधार केदार जाधवकडे महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व आहे. केदारची फटकेबाजी पाहण्यासाठी सोलापुरकर सज्ज आहेत. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणारा अंकित बावणे देखील या सामन्याचे आकर्षण असेल.
मोठ्या विजयाची गरज
सौराष्ट्रचा यंदाच्या हंगामातला सलामीचा झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णित झाला होता. हरयाणाविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाचा वचपा सौराष्ट्रने विदर्भविरुद्ध घेतला. या लढतीत त्यांनी २३८ धावांनी विजय मिळवला. सेनादलाविरुद्धचा सामना अनिर्णित झाला. सोलापुरात त्यांचा सामना तुल्यबळ महाराष्ट्राशी होणार आहे.
महाराष्ट्राने मणिपूरविरुद्ध एक डाव आणि ६९ धावांनी विजय मिळवत धडाक्यात सुरुवात केली. मात्र, झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला तर, राजस्थानविरुद्ध महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणाविरुद्धची लढतही अनिर्णित झाली. त्यामुळे या सामन्यात विजयासह आगेकूच करण्याची महाराष्ट्राला संधी आहे. मात्र, तरीही सगळ्यांचे लक्ष पुजाराच्याच कामगिरीकडे राहणार आहे. अर्थात ही लढत दोन्ही संघांसाठी महत्वाची असून त्यांना आता मोठ्या विजयाचीही गरज आहे.