Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final, Day 3 Stumps :– मुशीर खानचे शतक व अजिंक्य रहाणे, शम्स मुलाणी व श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतके यांच्या जोरावर यजमान मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद 418 धावा केल्या. आता विदर्भसमोर विजयासाठी तब्बल 538 धावा करण्याचे आव्हान असून सामन्याचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत.
तसेच विदर्भचा पहिला डाव 105 धावांतच संपला असल्यामुळे दुसऱ्या डावात ते कशी फलंदाजी करतात याकडे लक्ष राहणार आहे. मात्र, मुंबई विक्रमी विजेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे हे जवळपास निश्चित झाले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भाची बिनबाद 10 अशी स्थिती आहे. ध्रुव शौरी 7 तर अथर्व तायडे 3 धावांवर खेळत आहेत.
Stumps on Day 3 in the #RanjiTrophy Final!
Vidarbha 10/0 in the second innings, need 528 more runs to win.
See you tomorrow for Day 4 action 👋
Scorecard ▶️ https://t.co/L6A9dXYmZA#MUMvVID | #Final | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jowr0IDSpv
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 12, 2024
त्यापूर्वी, मुंबईने सोमवारच्या 2 बाद 141 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर रहाणे 73 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 143 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावला. मात्र, मुशीरने शतक साकार केले. त्याने श्रेयस अय्यरसह शतकी भागीदारी करताना संघाचे त्रिशतकही फलकावर लावले. अय्यर मात्र, शतक पूर्ण करु शकला नाही. तो 111 चेंडूत 10 चौकार व 3 षटकारांसह 95 धावा करुन बाद झाला.
अय्यरच्या नंतर लगेचच हार्दिक तमोरही परतला. मात्र, मुशीरने शम्स मुलाणीसह संघाला साडेतीनशे धावांचा पल्ला पार करुन दिला. मुशीर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 136 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने तब्बल 326 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार मारले. मुशीर परतल्यावर लगेचच शार्दुल ठाकूरही बाद झाला. मुलाणीने तनुष कोटियनसह संघाला चारशे धावांचा पल्ला पार करुन दिला. त्याने नाबाद अर्धशतक फटकावताना 85 चेंडूत 6 चौकार मारले. कोटियन 13 धावांवर बाद झाला. मुंबईचा दुसरा डाव 418 धावांवर संपला.
विदर्भसमोर विजयासाठी 538 धावा करण्याचे आव्हान ठेवत मुंबईने विक्रमी विजेतेपदाकडे आश्वासक वाटचाल केली आहे. विदर्भकडून हर्ष दुबेने 5 बळी घेतले. यश ठाकूरने 3 गडी बाद केले. खेळ थांबला तेव्हा विदर्भने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 10 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अद्याप 528 धावांची गरज आहे.
T20 World Cup 2024 : विराट कोहली T20 विश्वचषक 2024 च्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक कारण आलं समोर…
संक्षिप्त धावफलक – मुंबई पहिला डाव – सर्वबाद 244 धावा. विदर्भ पहिला डाव – सर्वबाद 105 धावा. मुंबई दुसरा डाव – 130.2 षटकांत सर्वबाद 418 धावा. (मुशीर खान 136, श्रेयस अय्यर 95, अजिंक्य रहाणे 73, शम्स मुलाणी नाबाद 50, हर्ष दुबे 5-144, यश ठाकूर 3-79). विदर्भ दुसरा डाव – 2 षटकांत बिनबाद 10 धावा. (ध्रुव शौरी 7, अथर्व तायडे 3).