संतोष पवार
सातारा -शाहूपुरी येथील नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 12 कोटी रुपये निधी मंजूर केल्यानंतर शाहूपुरीत चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. शाहूपुरी ग्रामविकास आघाडी आणि सत्ताधारी भैरवनाथ पॅनेलने हे काम आमच्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागात कायमच पाण्याची समस्या निर्माण होत होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा होत असला तर त्यात नेहमीच व्यत्यय येत होत्या. या पार्श्वभूमीवर कण्हेर धरणामधून वेण्णा नदीचे पाणी उचलून ते शाहूपुरीकरांना देण्यासाठी शाहूपुरी पाणी पुरवठा योजना उदयास आली.
या योजनेचे मोठ्या थाटात उदघाटन झाले. मात्र, अतिशय संथगतीने काम झाल्याने अजूनपर्यंत शाहूपुरीत पाण्याचा थेंबही आला नाही. सत्ताधारी भैरवनाथ पॅनलचे नेते संजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करुनही या कण्हेर पाणी योजनेचे काम पूर्णत्वास गेले नाही. खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रयत्न करुनही योजना पूर्ण झाली नाही.
त्यातच हद्ववाढ होऊन शाहूपुरी गण रद्द झाल्याने संजय पाटील यांचे सदस्यत्व गेले. हा पूर्ण गण सातारा नगरपालिकेत समाविष्ट झाला. या योजनेच्या पूर्ततेसाठी अनेक अडचणी येत गेल्याने शाहूपुरीचा पाणी प्रश्न काही मिटला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करुन अद्यापही ही योजना अपूर्णच आहे.
या परिसरात खा. उदयनराजे भोसले यांना मानणारे संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनल आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारे भारत भोसले यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी ग्रामविकास आघाडी सक्रिय आहे. साताऱ्यात मनोमिलन असले तरी शाहूपुरीत मात्र कधी मनोमिलन दिसून आले नाही.
सत्ताधाऱ्यांनीही कधी विरोधकांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप नेहमीच होत आला आहे. अनेक मुद्यांवरुन दोन्ही गटात नेहमीच संघर्ष होत आला आहे. कण्हेर पाणी योजनेवरुन तर दोन्ही गटात खटके उडाले आहेत. अनेकदा या योजनेचा श्रेयवाद उफाळून आला आहे. मात्र, अद्याप तरी या योजनेची पूर्ती करण्यात कोणालाच यश आलेले नाही.
शाहूपुरीचा नगरपालिकेत समावेश झाल्यानंतर प्रलंबित कामांचे काय होणार याची चिंता लागल्याने शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, सौ. शोभाताई केंडे, राजेंद्र केंडे, सौ. नीलमताई विकास देशमुख, सौ. माधवीताई शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन पाणी योजनेसह प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर आठच दिवसात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन 12 कोटी रुपयांचा निधी पाणी योजनेसाठी मंजूर केला आहे.
त्यामुळे शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया भारत भोसले यांनी व्यक्त केली असून आ. शिवेंद्रराजे भोसले आणि अजित पवार यांचे त्यांनी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्यावतीने आभार मानले आहेत. शाहूपुरीच्या विकासात खा. उदयनराजे भोसले यांचाच सिंहाचा वाटा असून कण्हेर पाणी योजना हे भैरवनाथ पॅनेलचेच यश असून उदयनराजे यांच्या पाठपुराव्यामुळेच या योजनेसाठी भरीव निधी मिळाला आहे. सत्ताधारी भैरवनाथ पॅनलने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागत असल्याचे निश्चितच समाधान आहे, अशी प्रतिक्रिया पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शाहूपुरी ग्रामविकास आघाडीने शाहूपुरीच्या विकासासाठी नेहमीच भरीव असे काम केले आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरीतील अनेक प्रश्न मार्गी लागले असून कण्हेर पाणी योजनेसाठी पहिल्यापासून आ. शिवेंद्रराजे भोसले आग्रही होते. त्यांच्या माध्यमातून या योजनेपासून भरीव असा निधी मिळाला आहे. सध्या देशावर करोनाचे संकट असताना राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना आ. शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे या पाणी योजनेला 12 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हे श्रेय आ. शिवेंद्रराजे भोसले आणि शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे आहे.
भारत भोसले , शाहूपुरी ग्रामविकास आघाडी