कोथरूड – देशात कोणीही काही मागून पोट भरू नये तर कष्ट करून पोट भरावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली. राजकारण करत असताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर मिळणाऱ्या निधीचा विनियोग हा समाजोपयोगी विकासासाठीच व्हावा, असे असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दिव्यांगांसाठी आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. त्यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ट्रस्टचे अमोल शिनगारे, नेचरवॉकचे अनुज खरे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, कोथरूड मंडल सरचिटणीस गिरीश भेलके उपस्थित होते.
यावेळी पुनीत जोशी यांच्या वतीने दिव्यांग उल्हास जौंजाळ यांना व्हिलचेअर भेट देण्यात आली. तर क्रिएटिव्हच्या वतीने संतोष भालेराव या दिव्यांग मित्रास चहाचा मोठा थर्मास भेट देण्यात आला.
दिव्यांग व्यक्तीस सहानुभूतीची नव्हे तर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देण्याची आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हेच काम क्रिएटिव्ह फाऊंडेशन करत असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले. यावेळी मंजुश्री खर्डेकर, पुनीत जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. अनुज खरे यांनी आभार मानले.
महापालिकेच्या एकूण बजेटच्या 5 टक्के रक्कम अपंगांसाठी खर्च करण्याचे बंधन आहे. मात्र, तो निधी खर्च होताना दिसत नाही. नोकरीमध्ये 4 टक्के दिव्यांगांना संधी मिळावी, यासाठी आगामी काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल. तसे झाल्यास दिव्यांग बेरोजगार न राहता स्वावलंबी होतील.
– चंद्रकांत पाटील, आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष