पुणे : गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामागे कयार हे वादळ कारणीभूत होते. रत्नागिरीच्या दक्षिणेकडे ते असून मुंबईपासून 350 किमीवर आहे. सध्या 12 किमि प्रतितास वेगाने पुढे सरकणारे हे वादळ सायंकाळपर्यंत तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.
त्याची तीव्रता वाढल्यानंतर कयारच्या वाऱ्याचा वेग ताशी 170 ते 180 पर्यंत वाढण्याचा धोका आहे. यावर्षी मे महिन्यात फनी या वादळाने ओडीसाच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला होता. त्या पाठोपाठ या वादळाचे संकट भारतीय समुद्रात घोंघावत आहे. मात्र क्यार हे भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नसून ते ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. यासाठी आणखी पाच दिवस लागू शकतात, असे वेधशाळेच्या सुत्रांनी सांगितले.
हे वादळ किनारपट्टीवर येण्याची शक्यता कमी असली तरी किनारावर्ती भाग आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील 48 तासात कोकण, गोवा आणि गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या वाऱ्याचा वेग 120 ते 130 किमि प्रतीतास असू शकतो, त्यामुळे सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. या काळात समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.