रत्नागिरी – कोकणातील आंजर्ले परिसरातीलसमुद्र किनाऱ्यावर कासव महोत्सव २८मार्च पासून सुरू होणार आहे.लाटांवर स्वार होण्यासाठी किनाऱ्यावरील रूपेरी वाळुतून दुडुदुडु धावत निघालेली कासवांची पिल्लं पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होणार असून ३० एप्रिलपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे.
कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आेलिव्ह रिडले जातीची कासवं नोव्हेंबर ते मार्च दरम्यान अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. कासवांमध्ये पालकत्व नसते. मादीअंडी घालून निघून गेल्यानंतर काही दिवसानंतर त्या अंड्यातील पिल्लंबाहेर पडून ती थेट समुद्राच्या दिशेने धावत निघतात.
होळीनंतर राज्यभरातील कासवप्रेमींना ‘कासवमहोत्सवा’ची आेढ लागते. महोत्सवाच्या तारखा कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष असते. दरम्यान, कासव-मित्र संघटनेचे तृशांत भाटकर यांनी २८ मार्चपासून‘कासव महोत्सव’ सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.
वाळूवरील कासवांच्या पावलांच्या ठशांचा माग काढून काही लोक अंडी काढून त्यांची चोरी करत असत. स्थानिक ग्रामस्थ, वन विभाग,कांदळवन फाउंडेशन, सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या जनजागृतीने त्याला आळा बसला. त्यासाठी कासवमहोत्सव सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगतले.
कासवांनी अंडी घातल्यापासून ते पिल्लू मोठे होईपर्यंतचा प्रवास खूप खडतर असतो. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले, वेळास येथील कासव मित्रांच्या पुढाकारातून सन२००५-०६ पासून स्थानिक ग्रामस्थ, वन विभाग, कांदळवण फाउंडेशन,
सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या माध्यमातून कासवांचे संरक्षण व संवर्धनाची चळवळ सुरू झाली आहे. आतापर्यंत कासवांची दीड-दोन लाख पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडण्यात आले आहे, असेही भाटकर यांनी सांगितले.
कासव मित्र करतात अंड्यांचे रक्षण
दरवर्षी साधारणत: मार्च ते नोव्हेंबर दरम्यान मादी कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते. त्या परिसरात कोणी नसल्याची खात्री करून किनाऱ्यापासून २०० ते ४०० मीटर अंतरापर्यंतजाऊन वाळूमध्ये एक ते दीड फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालते. एक मादी ८० ते १५० अंडी घालते.
तो खड्डा पुन्हा वाळूने बुजवून त्यावर ३६० अंशामध्ये फिरत दाब देते. पायाने त्यावरवाळू उडवून ती दुसऱ्या मार्गाने समुद्रात निघून जाते. कासव मित्र हे स्थानिकांच्या मदतीने मादीने अंडी घातल्यापासून दोन तासांच्या आत ती अंडी काढून स्वतंत्र संरक्षित ठिकाणी ठेवतात. त्यामधून बाहेर पडलेली पिल्ले समुद्राच्या काठावर सोडण्यात येतात.