नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत आता अरूणाचल प्रदेश या १५ व्या राज्याचाही समावेश करण्यात आला आहे. सर्वांधिक काळ उत्तरप्रदेशातून मार्गक्रमण हे त्या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. संबंधित यात्रा ६६ दिवस चालणार आहे. त्यातील ११ दिवस ती यात्रा उत्तरप्रदेशात असेल. त्या राज्यात यात्रा १ हजार ७४ किलोमीटर इतके अंतर कापेल.
राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील अमेठी, रायबरेली, वाराणसी आणि प्रयागराजमधून यात्रा जाईल. अमेठी आणि रायबरेली हे अनेक वर्षे कॉंग्रेसचे आणि प्रामुख्याने गांधी परिवाराचे बालेकिल्ले ठरले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत वाराणसी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांत यात्रा प्रत्येकी ५ दिवस असेल. याआधी यात्रेसाठी १४ राज्ये निश्चित करण्यात आली होती. मात्र, वाहतूक आणि सुरक्षाविषयक प्रश्न मिटल्याने अरूणाचलचाही यात्रामार्गात समावेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीतील घटक असणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण कॉंग्रेसने दिले आहे.