नवी दिल्ली – दोन वर्षांत भाजपच्या अनेक संस्थांनी छापे टाकले, मग एकही पैसा का मिळाला नाही? आप नेत्यांना जेलमध्ये टाकून आता मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीने कायदेशीर समन्स पाठवावे. कायदेशीर समन्सचेच पालन करेन, अशी प्रतिक्रीया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने तब्बल तीन समन्स धाडली, पण तरीही केजरीवाल चौकशीसाठी हजर झाले नाहीत. अशातच काही आप नेत्यांनी बुधवारपासूनच ईडीने केजरीवालांना अटक करण्याचा घाट घातल्याचे दावे करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील केजरीवालांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुंडगिरी उघडपणे सुरू आहे. कोणालाही पकडा आणि तुरुंगात टाका, माझी सर्वात मोठी ताकद प्रामाणिकपणा आहे. खोटे गुन्हे दाखल करून त्यांना माझ्या प्रामाणिकपणाला धक्का लावायचा आहे. ईडीने योग्य समन्स पाठवले तर मी तपासात सहकार्य करेन. भाजपचा उद्देश योग्य तपास करणे नसून, मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखणे हा आहे. मला लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता येऊ नये म्हणून चौकशीच्या बहाण्याने बोलावून मला अटक करण्याचा त्यांचा कट आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
आम्ही देशासाठी लढलोय –
सीबीआयने ८ महिन्यांपूर्वी मला समन्स बजावले होते, मी गेलो होतो. पण ईडीचे समन्स बेकायदेशीर आहे. ज्यांचे भाजपशी पटत नाही, त्यांना ते तुरुंगात पाठवतात. या कारणावरून त्यांनी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही तुरुंगात टाकले. त्यांनीही भाजपशी हातमिळवणी केली असती, तर ते तुरुंगाबाहेर आले असते. जो त्यांच्याशी हातमिळवणी करतो, तो प्रामाणिक होतो. या देशात जे काही चालू आहे ते धोकादायक आहे. आपल्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. आम्ही नेहमीच देशासाठी लढलोय, असेही केजरीवाल अखेरीस म्हणाले.