नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर मागच्या तीन दिवसांपासून देशाचा अन्नदाता आपल्या हक्कासाठी लढत आहे. शेतकऱ्यांच्या या हक्काच्या लढ्याला काँग्रेसकडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने आपल्या अहंकारामुळे देशातील जवान आणि किसान एकमेकांच्या समोर उभा केला असल्याचे म्हटले आहे.
बड़ी ही दुखद फ़ोटो है। हमारा नारा तो ‘जय जवान जय किसान’ का था लेकिन आज PM मोदी के अहंकार ने जवान को किसान के ख़िलाफ़ खड़ा कर दिया।
यह बहुत ख़तरनाक है। pic.twitter.com/1pArTEECsU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 28, 2020
नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला बळाच्या जोरावर थोपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. फोटोत एक जवान शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतानाचा हा फोटो अतिशय दुर्दैवी फोटो असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. ”आपण आजवर जय जवान, जय किसान असा नारा ऐकत आलो आहोत. पण आज पंतप्रधान मोदींच्या अहंकाराने जवान आणि किसान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. हे खूप धोकादायक आहे”, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर कालपासून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू आहे. पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पाण्याचा फवारा आणि अश्रू धुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. या सगळ्याला न जुमानता शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल यांनी शुक्रवारीही एक ट्विट करुन शेतकऱ्यांना पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला होता. अहंकार कधीच सत्यावर मात करू शकत नाही हे मोदींनी लक्षात ठेवायला हवं. सत्याचा लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना जगातील कोणतंच सरकार रोखू शकत नाही. मोदींना काळे कायदे मागे घ्यावेच लागतील आणि ही तर फक्त सुरुवात आहे, असे ट्विट राहुल यांनी केले होते.