नवी दिल्ली – गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या पीएम किसान योजनेचा उपयोग करोनाच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळण्यात झाला. अशी मदत मिळणाऱ्यांमध्ये तब्बल 25 टक्के महिला शेतकरी असल्याचे दिसून आले आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकारच्या थेट मदत हस्तांतरण (डीबीटी) योजनेतून मदत मिळालेल्या या महिलांच्या नावावर शेती असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांच्या नावावर शेती असण्यात ईशान्येकडील राज्ये आणि केरळने आघाडी घेतली असल्याचे यासंदर्भात माहिती अधिकाराखाली मिळालेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
पंजाब हे राज्य प्राधानान्ये कृषीप्रधान म्हणून ओळखले जाते. मात्र या राज्यात शेतजमिन महिलांच्यानावावर असल्याचे प्रमाण अत्यल्प आहे. डीबीटी अंतर्गत पंजाबमधील 23.3 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळालेली आहे. त्यापैकी फक्त 61 महिला शेतकरी आहेत.
देशव्यापी आकडेवारी लक्षात घेतली तर महिला शेतकरी लाभार्थ्यांची संख्या 2.4 कोटी (24.2 टक्के) आहे तर पुरुष शेतकरी लाभार्थ्यांची संख्या 7.7 कोटी (75.7 टक्के) आहे. पंतप्रधान किसान योजना ही 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे.