नवी दिल्ली- चीनने भारताची काही भूमी बळकावली आहे काय असा थेट प्रश्न कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा सरकारला विचारला आहे.
गेले काही दिवस ते चीन विषयांवरून सरकारवर ट्विटरवरून जोरदार हल्ले चढवत आहेत. आज त्यांनी आपले दिवंगत पिता राजीव गांधी यांनी लडाख मधील पॅंगॉंग त्सो तलावाचे काढलेले छायाचित्र प्रकाशित करून सरकारला हा सवाल केला. त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की चिनी आक्रमणाच्या विरोधात आम्ही सर्व एकजुटीने उभे आहोत. पण भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केले आहे काय? असा प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने भारतात अतिक्रमण केलेले नाही असे विधान केल्यानंतर ते सातत्याने या विषयीची विचारणा सरकारकडे उपस्थित करीत आहेत. सरकारने चीन सीमेवरील स्थितीबाबत वस्तुस्थिती स्पष्ट केली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.