बंगलुरू: कर्नाटकाच्या राजधानीत करोनाच्या अनेक केसेस
आढळून येत असल्याने काही ठराविक भाग सील करून भागणार नाही
तर संपूर्ण शहर पुन्हा किमान 20 दिवसांसाठी लॉकडाऊन केले पाहिजे,
अशी मागणी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सरकारकडे केली आहे.
सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. त्यांनी लोकांच्या जीवनाशी
खेळणे पूर्णपणे थांबवावे आणि संपूर्ण शहर पुन्हा लॉकडाऊन करावे तरच
करोना आटोक्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकात करोनाच्या लॉकडाऊन मुळे गरीब वर्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली असून त्यांच्यासाठी केवळ पॅकेजचे नाटक करण्याने काहीही साध्य होणार नाही सरकारने या गरीबांच्या खात्यावर किमान पाच हजार रुपये तातडीने
भरावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने राज्यातील सारी
स्थिती आटोक्यात असल्याचे खोटे चित्र रंगवणे थांबवावे अशी मागणीही
त्यांनी केली आहे.