भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे करणार नेतृत्व
“भारत जोडो’ यात्रेत हजारो कार्यकर्त्यांसह तीन दिवसांचा सहभाग
मिलन म्हेत्रे
पुणे – राहुल गांधींच्या “भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला पुणे जिल्ह्यातूनही बळ मिळावे म्हणून आमदार संग्राम थोपटे यांनी आघाडी घेतली आहे. ते सुमारे तीन ते चार हजार कार्यकत्यांचे बळ राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे करणार आहेत. आमदार थोपटे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत, तसेच ते “भारत जोडो’ यात्रेतही सहभागी होत नसल्याने ते भाजपच्याच वाटेवर असल्याचे जवळपास शिक्कामोर्तब झाले होते.
दरम्यान, पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ कधी ना कधी आपल्या पारड्यात पडतेच, याच भावनेतून आमदार थोपटे शांत राहिले आणि राहुल गांधी तथा कॉंग्रेसशी एकनिष्ठ असल्याची कृती “भारत जोडो’ यात्रेद्वारे तमाम जिल्हावासीयांना पाहायला मिळणार असल्याने ते भाजपच्या वाटेवर नसल्याचे सिद्ध होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे नेतृत्व “भारत जोडो’ यात्रेत भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे करणार असून, या यात्रेत पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्वच कॉंग्रेस पदाधिकारी 18,19, 20 नोव्हेंबर असे तीन दिवस सहभागी होत आहेत. शहरातून सुमारे 600 तर जिल्ह्यातून 3 हजारांहूनही अधिक कार्यकर्ते सहभागी होत असून, बरेच कार्यकर्ते हे सुरुवातीपासूनच या यात्रेत आहेत. “भारत जोडो’ ही कॉंग्रेसची मोहीम नांदेडमधून सुरू झाली.
महाराष्ट्रतील जिल्हनिहाय या यात्रेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांचे नियोजन झाले असून बुलढाणा जिल्ह्यातून 18 नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या पदयात्रेसाठी “पुणे विभागा’चे कॉंग्रेस नेते 17 नोव्हेंबरला अकोला येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली जमा होत आहेत.
संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघात आमदाकीची हॅट्ट्रिक केलेलीच आहे. पुणे शहराचे ते कॉंग्रेस प्रतोद आहेत. याचबरोबर त्यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचेही ते मानकरी ठरले असते; पण राजकारणात झालेल्या सत्ताबदलाने त्यांचे हे “लाल दिव्या’चे स्वप्न हुकले आहे; मात्र पुढील काळात ते मिळण्याची आशा असल्याने संग्राम थोपटे यांच्यासाठी ही रॅली वरदान ठरते का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भोरचे कार्यकर्ते सक्रिय करण्याची संधी
या रॅलीच्या निमित्ताने भोर विधानसभा मतदारसंघातील तरुण कार्यकर्ते सक्रीय करून पक्ष संघटन करण्यासाठी असलेली ही संधी आहे. त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांच्या माध्यमातून शिक्षण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी आधीच कार्य केले आहे, या दुर्गम भागात ते वाढवण्याची संधीही त्यांना प्राप्त होणार आहे.
बड्या नेत्यांच्या भोरला भेटी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांची मुळशी भेट या सगळ्या गोष्टी बारामती मतदारसंघ भाजपला जिंकायचा असल्याने त्यांचे होत असलेले प्रयत्न आणि त्यांना शह देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षवाढीसाठी तीनही तालुक्यातील तरुणांना सक्रीय होण्याचे केलेले आवाहन या सर्वांवर मात करण्यासाठी आणि संग्राम थोपटे यांचे “भोर-वेल्हे-मुळशी’तील “साम्राज्य’ अबाधित ठेवण्यासाठी या “रॅली’चा ते पुढील काळात फायदाच करून घेणार हे देखील स्पष्ट होत आहे.