श्रीकांत कात्रे
पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली तर व्यवसायात चांगला जम बसू शकतो. त्यातही तो व्यवसाय कलेशी निगडित असेल आणि कलाकृती बनविण्यात रस असेल तर आणखीनच सोपे होऊन जाते.त्याबरोबरच कष्ट करण्याची तयारी असल्यावर चिकाटीने व्यवसायात उभारी मिळू शकते. अनिता आपटेकर यांनी ते सिद्ध केले आहे. मातीच्या विविध प्रकारच्या आणि आकाराच्या वस्तू बनवून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मातीच्या वस्तू बनवताना त्या आकर्षक होण्यासाठी त्याला कलेची जोड द्यावी लागते. रंगांची कलाकुसर करावी लागते. मातीला जीव लावून त्या काम करत असल्याने जणू ती कलाकृतीही जिवंतच होते.
पुणे- मुंबई रस्त्यावरील चौकजवळचेतुपगाव हे गाव मडक्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. अनिता आपटेकर याच गावच्या. मातीकामाचा पारंपरिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांनी दाखवलेली चिकाटी महत्त्वाची ठरली. कलाकृती बनवायची आणि त्याची विक्री करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. माहेरी असताना आईवडिल हे काम करत असतं. ते काम पाहून पाहून त्या शिकत गेल्या. तुपगावला सासरी आल्यानंतर त्यांनी आत्ये दिराच्या मदतीने स्वतः या वस्तू बनविण्यास सुरवात केली.
खरं तरं हा त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पारंपरिक व्यवसाय. मातीच्या चुली आणि मडक्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सासरी आल्यानंतर हे काम करून आपल्या घराला आर्थिक हातभार लावला पाहिजे, या विचारातून त्यांनी हे काम सुरू केले. सासरचे त्यांचे कुटुंब संयुक्त आहे. त्यामुळे असे काम करण्याची खरं तरं गरज नव्हती. पण लहानपणापासून मातीच्या वस्तूंची निर्मिती होताना त्यांनी केलेले निरीक्षण त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते. कलेचीही त्यांना आवड होती. मातीकामाने तयार होणाऱ्या वस्तू आकर्षक होण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. चुली, मडकी याबरोबरच गणपतीचा मूर्तींचा कारखाना आणि काही शोच्या वस्तू त्या तयार करण्यास त्यांनी सुरवात केली. त्यात प्रामुख्याने टेबल लॅम्प, छोट्या मोठ्या मातीच्या कुंड्या, मातीचे दिवे, हत्ती स्टॅंड, दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीला सुगडी अशा हंगामी वस्तू, मातीची खेळणी याबरोबरच छोटे गणपती अशा कलाकृतींची निर्मिती सुरू झाली. या वस्तूंच्या विक्रीबरोबरच परिसरात त्या रांगोळीची विक्रीही मोठ्या प्रमाणावर करतात.
सुरवातीला त्या एकट्या हे काम करत होत्या. आता त्यांना काही महिलांचीही मदत घ्यावी लागते. व्यवसायासाठी कच्चा माल म्हणजे वीटभट्टीतून 1500- 1600 रुपयांची एक गाडी याप्रमाणे माती आणावी लागते. ही माती दोन-तीन प्रकारची असते. ही माती भिजवायची, गाळायची, राखघालून चाळायची, त्याचा ढीग लावून ठेवायचा अशी तीन दिवसांची प्रक्रिया करायची. चुल किंवा इतर वस्तूंचा डाय असतो. त्यानुसार वस्तू तयार करायच्या, हाताने फिनिशिंग करायचे, रंगकाम करून वस्तू आकर्षक करायची असे हे सारे काम चिकाटीनेच करावे लागते. या कामात पती आणि दोन मुलीही मदत करतात. वस्तू बनविण्यापेक्षा होलसेल विक्री करण्याचे धोरण त्यांनी राबविले. त्यामुळेच गावात इतरांकडून तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. त्याला थोडा कमीच प्रतिसाद मिळाला.
चुली व मडकी मडक्यांना असणारी मोठी मागणी लक्षात घेऊन त्यांनी आईवडलांकडून मालेगाववरून (नाशिक) तयार मालही आणण्यास सुरवात केली. त्याचदरम्यान त्यांचा माणदेशी फाउंडेशनशी संपर्क आला. वर्षभरात माणदेशीच्या विविध उपक्रमांत त्या सहभागी झाल्या. मार्केटिंगचे तंत्र, फेसबुक, व्हॉटसऍप आदी तंत्रासह डीजिटल मार्गदर्शन, अकाउंटस्, लोकांशी संवाद साधणे अशा अनेक बाबी माणदेशीकडून त्यांना शिकता आल्या. अशा मातीकामासारख्या देशात अनेक जुन्या कला आहेत. त्या कला लुप्त होत चालल्या आहेत. लुप्त होणाऱ्या कलांना व त्या कलाकारांना साथ द्यावी, त्यांना अजून मोठे कसे करता येईल, त्यांचे कोशल्य अधिक विकसित कसे करता येईल याला माणदेशी महत्त्व देत आहे. त्या कलाकारांना त्यांची किंमत व योग्य मोबदलाही मिळाला तर नव्या पिढीलाही कलांचे आकर्षण राहिल. नवी पिढी कलांकडे आकर्षित झाली नाही तर कला राहणार नाही.
जन्या कलांमध्ये मॅकेनायझेशन आणले पाहिजे, ते नाही आणले तर नवी पिढी त्यात राहणार नाही. असे काम करणाऱ्यांचे हात बबळकट करण्याची भूमिका माणदेशीने घेतली आहे. आयोजित केलेल्या चेंबूर येथील प्रदर्शनात त्यांनी स्टॉल लावला. ओळखी वाढल्या. त्यांनी निर्मिती केलेल्या वस्तूंची पेण, नेरळ, कर्जत या परिसरात विक्री होते. हा माल जास्त तयार करून ठेवण्यात मोठी जोखीम असते. वस्तू फुटण्याची भीती असते.त्यामुळे ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे वस्तू तयार केल्या जातात, असे त्यांनी सांगितले. नाशिकवरून माल आणताना थांबत थांबत यावे लागते.
पावसाळ्यात मातीच्या कुंड्या बनविण्यासाठी अधिक लक्ष द्यावे लागते. रोजचे घरकाम सांभाळून मुलींचे आवरल्यानंतर त्या या कामाला सुरवात करतात. दिवसभर कष्ट करून वस्तूंच्या मार्केटिंगसाठीप्रयत्न करायचे, होलसेल विक्री असल्यामुळे ज्या त्या ठिकाणी माल पोहचेल, याचे नियोजन करायचे, यात दिवस कसा संपतो, तेही लक्षात येत नाही. अनिता आपटेकर यांचा आता या व्यवसायात जम बसला आहे. परंतु, त्यामागे मोठे कष्ट आहेत. मेहनतीने आणि चिकाटीने त्यांनी हा व्यवसायाचा डोलारा सांभाळला आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत कल्पकतेने त्यांनी जिद्दीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एक महिला वेगळा दृष्टीकोन ठेवून होलसेल विक्रीचे लक्ष्य ठेवून कार्यरत राहिली तर ती खूप वेगळे आणि अनुकरणीय असे काम उभे करून शकते, हेच त्यांनी सिद्ध केले आहे