राणी मुखर्जीचा “मर्दानी 2′ रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो आहे. केवळ 3 दिवसातच या सिनेमाने 18 कोटींचा धंदा केला आहे. या निमित्ताने यशराज स्टुडिओमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये राणीने आपले मनोगत व्यक्त केले. महिलांनी अधिक सामर्थ्यवान व्हायला हवे. ही आज देशातील महिलांचीच गरज आहे, असे राणी म्हणाली. आपल्या सिनेमातूनही हाच संदेश दिला गेल्याचे तिने सांगितले. तिने स्वतःचा अनुभवही सांगितला.
लहानपणापासून तिच्याबरोबर ज्याने कोणी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, त्याला राणीने सरळ सरळ थोबाडले आहे. देशभरात पूर्वीही बलात्काराच्या घटना घडत होत्या. मात्र आता केवळ मिडीयामुळे या घटना देशभरातील लोकांना समजायला लागल्या आहेत. सतत या घटना कानावर यायला लागल्यावर आपण तो विषय उचलला पाहिजे असे वाटले. म्हणूनच आपण हा विषय निवडल्याचे दिग्दर्शक गोपी पुथरणने सांगितले. गोपी पुथरणनेच “मर्दानी 1’ची कथाही लिहीली होती. सिनेमातला व्हिलन म्हणून विशाल जेठवाचा हा पहिलाच सिनेमा आहे. व्हिलन म्हणून स्वतःला काम करण्याची सवय व्हावी, म्हणून त्याने चक्क अंगाला साबण लावणेही बंद केले होते.