नागरिकत्वाच्या कायद्यावरून मोदींचे कॉंग्रेसला आव्हान
भोगनादिह: कॉंग्रेस आणि त्याचे मित्र नवीन नागरिकत्व कायद्याबद्दल खोटे बोलत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. सर्व पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल असे त्यांनी जाहीर करण्याचे धाडस दाखवावे. कॉंग्रेसने जम्मू आणि काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा एकदा लागू करून दाखवावे तसेच तिहेरी तलाक बंदीचा कायदाही रद्द करून दाखवावा, असे आव्हानही मोदींनी दिले.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्दयावरून देशभरात आंदोलने भडकली असताना आपले हेतू साध्य करण्यासाठी शहरी नक्षल्यांच्या कारस्थानासाठी आपला वापर केला जात नाही हे विद्यार्थ्यांनी तपासून पहावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. आपले नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, अशी ग्वाही मोदींनी निवडणूक प्रचार सभेदरम्यान दिले.
देशातील मुस्लिमांमध्ये कॉंग्रेस भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. कॉंग्रेसने हे घाणेरडे राजकारण थांबवावे आणि देशातील सामाजिक बांधणी नष्ट करू नये. केवळ कॉंग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणामुळे लाखो घुसखोरांनी भारतातच घर केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्दयावरून सरकार खुल्या चर्चेसाठी तयार आहे. या संदर्भात जर काही चूक असेल तर लोकशाही मार्गाने त्याचा विरोध व्हावा. धार्मिक अत्याचारांमुळे जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तीन देश सोडून पळून भारतात आले. जे दयनीय परिस्थितीत जगत आहेत आणि परत जाऊ शकत नाहीत, हा कायदा अशा लोकांसाठी आहे, असे मोदी म्हणाले. या कायद्यामुळे भारतातील मुस्लिमांना किंवा अन्य धर्माच्या भारतीयांना काय त्रास होणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला.