…ही केवळ सदिच्छा भेट
पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाची? यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असताना शुक्रवारी हे दोन्ही नेते बाणेर येथील एका घरगुती सोहळ्यास एकत्रित उपस्थित राहिले. या भेटीनंतर अजित पवार लगेचच दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले. याबाबतचे वृत्त माध्यमांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या कार्यक्रमातून बाहेर पडताना “आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
यावेळी शरद पवार, अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. मात्र, या भेटीच्या काही वेळापूर्वीच दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील “मोदी बाग’ या निवासस्थानी भेट घेतली होती. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रम आणि दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी त्यानंतर लगेचच अजित पवार हे शरद पवार यांना भेटल्याने या दोन्ही भेटींबाबत चर्चेला सुरुवात झाली. तसेच दिल्लीला जाण्यापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला.
काय म्हणाले वळसे-पाटील
या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही. ही भेट पुर्वनियोजित होती. रयत शिक्षण संस्थेच्या निमित्ताने माझी भेट झाली असून संस्थांच्या कामासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन नेहमीच घेत असतो. संस्थात्मक राजकारणात शरद पवार अनेक ठिकाणी अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचाच अंतिम शब्द आहे. सहकारी संस्थांचे काही प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सरकारने घेतलेल्या काही निर्णयांची माहिती शरद पवार यांच्या कानावर घातल्याचे दिलीप वळसे पाटलांनी दिली.