लोणी काळभोर (राजेंद्र काळभोर) -पुणे शहराच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र हडपसर महानगरपालिका असावी, अशी मागणी हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभा अधिवेशनात केल्यामुळे हा मुद्दा परत चर्चेत आला आहे. राज्य सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी या संदर्भात धोरणात्मक व ठोस निर्णयाची अपेक्षा असून धरसोडीच्या निर्णयांमुळे परिसराच्या विकासाला खीळ बसत आहे.
पुणे शहराच्या पूर्व भागासाठी म्हणजेच हवेली तालुक्याच्या पूर्व भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी पिंपरी-चिंचवडप्रमाणे स्वतंत्र महापालिका तयार करावी अशी अशी आग्रही मागणी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत केली. पूर्व हवेलीतील नागरिक हडपसर आणि परिसराची स्वतंत्र महापालिका तयार करावी अशी मागणी करीत आहेत. पुणे महापालिका पूर्व पुण्यातील भागावर लक्ष देत नाही. पूर्व पुण्यातील वाघोली, लोणी काळभोर, उरुळी कांचन, नायगाव, सोरतापवाडी, थेऊर, हडपसर, वडकी, वडाची वाडी, होळकरवाडी, हांडेवाडी आदी बड्या गावांची मिळून स्वतंत्र महापालिका तयार करण्याची आवश्यकताही तुपे यांनी आपल्या मागणी दरम्यान मांडली. पिंपरी- चिंचवडप्रमाणे “अ’ दर्जाची महापालिका येथे तयार होऊ शकते. एक-दोन गावे महापालिकेतून बाहेर काढण्यापेक्षा पूर्व पुण्याची वेगळी महापालिका झाल्यास या भागाचा विकास होईल आणि त्याचा निर्णय लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी तुपे यांनी केली.
पुण्याचा कारभार पाहणं सुरळीत व्हावं यासाठी पुणे महापालिकेचं विभाजन होऊन दोन महापालिका व्हायला हव्यात असं मत मध्यंतरी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मांडले होते. पुणे महापालिका आज क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका बनली आहे. काही महिन्यांपूर्वी 23 गावांचा पुणे महापालिकेत नव्याने समावेश झाल्याने पुणे महापालिकेची हद्द 485 चौरस किलोमीटर होऊन पुण्याने मुंबईलाही क्षेत्रफळाच्या बाबतीत मागे टाकले आहे. त्याचबरोबर 23 गावांमधील आठ ते नऊ लाख लोकसंख्याही महापालिकेत आली आहे. खरं तर पुणे महापालिकेचं विभाजन करून हडपसर ही नवीन महापालिका अस्तित्वात यायला हवी ही मागणी 23 गावांचा पुण्यात समावेश होण्याच्या कितीतरी आधीपासून होत आहे. वाढत्या लोकसंख्येला रस्ते, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा पुरवणं महापालिकेला दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. त्याचबरोबर नागरिकांनाही त्यांची कामं करण्यासाठी महापालिकेत जाणं अडचणीचं ठरत आहे. पुणे महापालिकेच असं विभाजन व्हायला हवं अशी भूमिका महापालिका समर्थकांनी घेतली आहे. हा पुण्याला तोडण्याचा प्रयत्न असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
भावनिक प्रश्न
पुनवडी, कसबा पुणे, पुणे शहर आणि आता पुणे मेट्रो असा पुण्याचा प्रवास राहिला आहे. या प्रवासादरम्यान शिक्षण संस्कृती, कला आणि इतरही क्षेत्रात पुणे हा एक ब्रॅंड तयार झाला आहे. त्यामुळं कारभार सुरळीत होण्यासाठी पुण्याचं विभाजन होणं आवश्यक असलं तरी हा विषय भावनिक होणार आहे. त्याहून महत्वाचं म्हणजे विभाजनामुळे आपले प्रश्न सुटू शकतील असा विश्वासही नागरिकांमध्ये राज्यकर्त्यांना निर्माण करावा.
चार महापालिकांचीही मागणी
खरं तर पुण्याप्रमाणे मुंबई महापालिकेचे विभाजन करून चार महापालिका व्हायला हव्यात, अशी मागणीही गेल्या काही दिवसांपासून होत आहे. राज्यातील वाढत चाललेलं नागरीकरण पाहता इतर महापालिकांबाबतही अशीच मागणी पुढं येण्याची शक्यता आहे. मात्र फक्त मागणी करून न थांबता त्याबाबत प्रत्यक्षात काही पावलं उचलली जातात का आणि त्यातून लोकांचे प्रश्न सुटतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सुविधा पुरविण्यासाठी क्षेत्र मर्यादित हवे
सुरुवातीला 11 आणि त्यानंतर शहराच्या हद्दीलगतची आणखी 23 गावे पालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली आहेत. ोणत्याही महापालिकेला चांगल्या दर्जाच्या नागरी सोयी-सुविधा नागरिकांना पुरविता याव्यात, यासाठी त्याचे क्षेत्र मर्यादित असणे गरजेचे आहे. हद्दीलगतची सर्व गावे समाविष्ट झाल्याने पुणे महापालिकेला या सर्व गावांमध्ये नागरी सेवा पुरविताना मोठा ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे हडपसरसह समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका निर्माण करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मात्र समावेश होणाऱ्या लोणी काळभोर, उरुळी कांचन आदी गावातील नागरिकांची भूमिका काय आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे.