कापूरहोळ -लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपताच पुणे व मुंबई येथून बाहेरगावी जाण्यास नागरिकांना मुभा दिल्याने या शहरातून भोर वेल्हा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक सहकुटुंब आपापल्या गावात दाखल झाले आहेत. गेली दोन महिने लॉकडाऊनचे ग्रामीण भागातील नागरिकांनी काटेकोर पालन केले होते परंतु आता त्याचा काय उपयोग होणार? असा सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
वेल्हे तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या नसरापूर, चेलाडी व कापूरहोळ येथील तपासणी नाक्यावरुन नागरिक भोर, वेल्हा तालुक्याकडे रिक्षा, मोटार या वाहनांमधून रवाना झाले आहेत. तसेच, कापूरहोळ येथील भोर फाटा तपासणी नाक्यावर भोरच्या वरील दुर्गम भागातील गावांमधील मुंबई येथे राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे.विशेष म्हणजे या गाड्यांमधील बऱ्याच नागरिकांकडे मुंबई येथे तपासणी केलेला अहवाल व पोलीस परवाना देखील नाही.
या धोक्याची शक्यता पाहता गावचे पोलीस पाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांचे एक करोना सुरक्षा दल स्थापन केले असून, गावामध्ये पुण्या- मुंबई येथून येणाऱ्या सर्व नागरिकांना गावाबाहेरील शाळा, समाज मंदिर आदी ठिकाणी क्वारंटाइन करणार आहे. त्यासाठी गावामधील तरुण व ग्रामस्थांचे प्रशासनास सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले आहे.