भविष्यही अंधारमय : गुरव पुजारी समाजाची व्यथा; आर्थिक संकटामुळे वाढली चिंता
पिंपळे गुरव – करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला आहे. गुरव पुजारी समाजावरही लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.
करोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे भक्त, भाविक यांनी मंदिर, धार्मिक स्थळांकडे येण्यास पाठ फिरवली असल्याने गुरव पुजारी समाज आर्थिक संकटात सापडला आहे. कुटुंबाचा उदर निर्वाह चालविणे कठीण झाले आहे. भविष्याचे ओझे कसे पेलावे, असा प्रश्न त्यांच्यावर ओढवला आहे.
सध्या करोनाची भीती असली तरी त्यापेक्षा उपासमारीची भीती भयंकर भेडसावत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे घरात आता दोन वेळच्या जेवणाचे वांदे झालेले आहेत. बाहेर लॉकडाऊन असले तरी पोटाचे “लॉकडाऊन’ कसे करणार. काही पैसे होते त्यामुळे एक दीड महिनाभर काही वाटले नाही. मात्र लॉकडाऊन सातत्याने वाढत असल्याने जीवाची घालमेल होत आहे, असेही काही समाजबांधव सांगत आहेत.
गुरव, पुजारी यांना राज्य सरकारने अर्थसहाय्य करावे
“करोना व्हायरस’मुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व समाजांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील मंदिरातील गुरव पुजारी बांधवांना विशेषत: देवाची मनोभावे पूजा करणारा गुरव समाज अडचणीत आला आहे. त्यामुळे राज्यातील गुरव, पुजारी यांना या संचारबंदी काळात सरकारकडून अर्थ सहाय्य देण्यात यावे आणि गुरव, पुजारी समाज बांधव यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा करून सहकार्य करावे, अशी मागणी अखिल गुरव समाज संघटना पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष पुरुषोत्तम वाघमारे यांनी “दैनिक प्रभात’शी बोलताना केली.