खडकवासला -विविध कारणांमुळे अनेक वर्षांपासून रखडलेला खडकवासला धरणावर उभारण्यात आलेला जलविद्युत प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाची चाचणीही यशस्वी झाली असून लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या धरणाच्या मुठा उजवा कालव्यातून सिंचनासाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यातून 1.2 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याबाबत 2006मध्ये राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली होती. त्यानुसार या प्रकल्पात 600 किलोवॅटच्या दोन जनित्रांद्वारे 1. 2 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. हे वीजनिर्मितीचे काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा बीओटी तत्त्वावर एका कंपनीला देण्यात आले आहे.
या कंपनीने डिसेंबर 2010पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते; मात्र कालवा बंद करून खोदाईचे काम करण्यास कंपनीला परवानगी मिळाली नाही. त्यानंतर करोना आणि कामगारांची वानवा या व अशा कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले. आता या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्याची चाचणीही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण यांच्याकडून परवानगी घेण्यात येत असून लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.
दरम्यान, वीजनिर्मितीसाठी खडकवासला धरणात सुरुवातीलाच पॉवर हाऊस बांधण्यात आले आहे. पाणी सोडल्यानंतर पॉवर हाऊसमध्ये जनित्रांद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. हे पाणी पुन्हा कालव्यात सोडले जाईल. धरणातून कालव्यात वर्षभरात 170 दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे वर्षातील सहा महिने या प्रकल्पातून वीजनिर्मिती करणे शक्य आहे. वीज तयार झाल्यानंतर ती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित किंवा महानिर्मितीला विकत देण्यात येणार असल्याचेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.