तुकोबा असे म्हणतात,
‘त्यात कोणाचे काय बा गेलें!
ज्याचें तेणें अनहित केले ।। ‘
याचा अर्थ असा ज्यांचे त्यानेच अनहित केले. पण ज्याचे त्यानेच अनहित केले हे समजण्यासाठी त्याचे हित अनहित कशात आहे हे त्याला समजले तर पाहिजे.
करोना कालावधीमध्ये सर्व शाळा बंद झाल्या .हळूहळू ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा पर्याय निर्माण करण्यात आला .परंतु मुलापर्यंत ऑनलाइन शिक्षण जाण्यासाठी पायाभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीत. ‘लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर आणि लोकमंगल माध्यमिक विद्यालय’ माझ्या घरासमोरच शाहूपुरीत आहे. यावर्षी दसरा झाला आणि एक महिला पालक शाळेत आले. दोन मुलांना घेऊन शाळेमध्ये पोहोचविण्यासाठी आली. मी घराच्या फाटकातच होतो. साधारण सकाळी दहाची वेळ होती. मी त्या दोन मुलांची विचारपूस केली तर समजले एक चौथीमध्ये होता तर एक सहावीमध्ये. मी विचारपूस करीत असताना लक्षात आले की ही दोन्ही मुले सात- आठ दिवस शाळेत आलीच नव्हती. मी त्या पालकांना नाव विचारले तर त्यांचे नाव ललिता लक्ष्मण खवले होते आणि त्या रोजंदारीवर कामाला जात असत. ती दोन मुले म्हणजे आदित्य आणि अविनाश. पण जेव्हा ललिता खवले मला असे म्हणाल्या…”माझी दोन्ही मुले सुरक्षित राहतील ना?
सध्या साताऱ्यात मुले पळवणारी टोळी फिरत आहे आणि मुले पळवितात असे समजतेय. आणि हे सांगताना तिच्या डोळ्यात पटकन अश्रू उभे राहिले. मी नखशिखांत हादरलो. मी म्हटलं असं काही नाही. हे चुकीचे कोणीतरी पसरवतेय. आम्ही आहोत, काही काळजी करू नका. त्या माऊलीला विश्वास वाटला आणि ललिता खवले जाताना मला सांगून गेले की माझ्या शेजारी राहणारे लक्ष्मण धांडे नवरा-बायको आपल्या मुलांसह ऊस तोडणीसाठी परगावी गेले असून चौथीतील ओंकार धांडे आणि त्याचा भाऊ पाचवीतील संतोष धांडे एक महिना शाळेत येणार नाहीत. तरी तुम्ही त्यांच्या शिक्षकांना सांगाल का? त्यांची अडचण मी सांगतो म्हणालो.
पण माझे विचार चक्र चालू झाले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बहुतेक पालकांना दोघांनाही मोलमजुरीसाठी बाहेर पडावे लागते. अशा वेळी आपल्या विद्यार्थीदशेतील पाल्यांसाठी त्यांची शिक्षणापेक्षाही पहिली गरज काय असते तर त्यांची सुरक्षितता. त्यांच्या मुलांना शाळा हे दिवसभर थांबण्याचे एक सुरक्षित ठिकाण असतं. सुरक्षितते बरोबरच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून तसेच वेगवेगळ्या समाजविघातक धोक्यांपासून ते वाईट सवयी न लागण्यासाठी शाळा हे माध्यम त्यांना महत्त्वाचे आणि निकडीचे वाटते.
ऑनलाइन शिक्षण तर सोडाच पण त्या पालकांना शिक्षणाचे महत्त्वही समजत नाही. पण आपल्या पाल्यांची सुरक्षितता आणि त्यांचे संगोपन हेच ज्यांचे उद्दिष्ट असते, त्यांच्यासाठी त्या विद्यार्थ्यांचे आपण समाजाने पालक होणे ही बाब महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपणास जेवढे शक्य आहे तेवढे सामाजिक भान ठेवून त्या विद्यार्थ्यांना त्यांचे हित व अनहित कळण्याइतपत तरी शिक्षण आणि संस्कार देणे आपले कर्तव्य आहे.
मी माझ्यासमोरच असलेल्या शाळेतील चौथीच्या शिक्षिका काळे मॅडम यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांच्या वर्गावर जायला सुरुवात केली आणि मुलांना मला जे शक्य आहे ते त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न चालू केला माझ्या लक्षात आले काही मुलांचे सोळाचे पाढे पाठ आहेत तर काहींचे सहाचा व सातचा पण नाही. माझ्या मनात एक कल्पना सुचली. यातील ज्या मुलांचे पाढे जास्त पाठ आहेत, त्यांनाच एकेक विद्यार्थ्याचा शिक्षक केले तर… आणि मी विचारले, तर शिक्षक होण्याचा आनंद सर्व मुलांनाच घ्यायचा होता.
मुले खुश झाली आणि ज्या विद्यार्थ्यांचे पाढे पाठ नाहीत त्यांचे ते करून घेऊ लागले. त्या विद्यार्थ्यांना आपल्या मित्र-मैत्रिणींचे पाढे पाठ करून घेणे आणि इतरही शिकवणे हे आनंददायी व प्रेरणादायी वाटत आहे. त्याचबरोबर गणित, पाढे व इतर काही आपल्या मित्र-मैत्रिणींना समजावून देताना त्यांना आनंदाबरोबरच उजळणीही करता येत आहे ही बाब म्हणजे छोट्या गोष्टीतून मोठा आनंद देणारा झराच ठरावा.
आपण समाजातील सर्व घटकांबरोबर कायमच संपर्कात असले पाहिजे. शिक्षक नसलेल्या प्रत्येक व्यक्तीने मनात आणले तर शिक्षक म्हणून आपण असलेल्या ठिकाणी काही काम करू शकतो. देण्याने मिळणारा आनंद हा सर्वात आल्हाददायी आहे.
नवीन काही रोज शिकविते
शाळा आमुची न्यारी,
कधी कधी मग शिक्षक होण्या
गंमत वाटे भारी………..!