सातारा – सातारा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनू लागली असताना आता गोडोली चौकाचा श्वासही या कोंडीत गुदमरू लागला आहे. वाहतुकीचे कोणतेच नियोजन नसल्याने हा चौक आहे की भाजीमंडई असा प्रश्न वाहनधारक व पादचाऱ्यांना पडू लागला आहे.
चौक एक, समस्या अनेक?
गोडोली चौकात कोल्हापूर व रहिमतूपरमार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. या चौकातच अनेक रिक्षा, एसटी बस, वडाप व खासगी वाहने प्रवाशांसाठी उभी असतात. रस्त्याकडेला भाजी व फळविक्रेते बसलेले असतात. अरुंद रस्ता असूनही अनेक दुचाकीचालक रस्त्याकडेलाच गाडी उभी करतात. अशा एक न अनेक समस्यांनी हा चौक ग्रासला असून वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
वाहतुकीला नाही शिस्त
गोडोली चौकात ना सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे ना पोलिस कर्मचारी येथे कार्यरत असतात. त्यामुळे या चौकातील वाहतुकीला कोणतीही शिस्त राहिलेली नाही. वाहनधारक कोठूनही व कशीही आपली वाहने दामटत असल्याने याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो.
हे करायला हवं
गोडोली चौकात पाच रस्ते एकत्र येतात. वनवे असल्याने एकाच रस्त्यावरून वाहनांची येजा सुरू असते.
या चौकातील रस्त्याचे रुंदीकरण करायला हवे
रहिमपूर व कोल्हापूर मार्गावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करायला हवी
हातगाडीधारक, भाजी विक्रेत्यांची स्वतंत्र व एकाच ठिकाणी व्यवस्था करावी
या चौकातील सर्व अतिक्रमणे पालिकेकडून हटविण्यात यावी