मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथील अंगणवाडीच्या मागच्या खिडकीचे लॉक तोडून काही अज्ञात समाजकंटक तळीरामांनी दारूच्या बाटल्या वर्गखोलीमध्ये फोडून फेकून दिल्याची घटना सोमवारी (दि. 30) उघडकीस आली.वर्गामध्ये काचा झाल्या असून, माती आणि विटांचा चुराही वर्गात फेकण्यात आला आहे. शाळापरिसर म्हणजे तळीरामांचा दारूचा अड्डा बनला असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
अंगणवाडीमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गंगाराम भालेराव, अध्यक्ष सुनील भालेराव, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नीलेश कानडे, ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे, दत्ता कानडे, नितीन भालेराव, द्राक्ष बागायतदार सचिन कानडे,
इसाक शेख, प्राचार्य सुनील टाव्हरे, मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव, शिक्षक संतोष कानडे, अंगणवाडी शिक्षिका अर्चना श्रीशेटे, निर्मला कहडणे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी पाहणी केली. अज्ञात समाजकंटकांचा ग्रामस्थ कसोशीने शोध घेत आहेत.
या ठिकाणी शाळेचे सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरातील व्यावसायिकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात संशयितांवर कळंब ग्रामस्थ कडक कारवाई करणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती आणि कळंब ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच उषा कानडे आणि उपसरपंच संतोष ऊर्फ गोकुळ भालेराव यांनी सांगितले.