पाकिस्तानातील विशेषतज्ज्ञ म्हणत आहेत की, पाकिस्तानच्या आजच्या स्थितीचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. तसे जर असेल तर शेजारचा भारत त्यापासून कसा मुक्त राहू शकतो?
शेजारच्या पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाला. शंभर लोक त्यात मृत्यूमुखी पडले. अडीचशेपेक्षा जास्त जखमी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीच्या बातम्या येत आहेत. त्यावर शिक्कामोर्तब करणारीच ही घटना. याला शिक्कामोर्तब म्हणण्याचे कारण असे की, त्या देशात खरेच आता इतके हाताबाहेर गेले आहे की सुरक्षा संस्थांशी निगडीत लोकांची सुरक्षा होणेही अवघड झाले आहे.
पेशावरच्या स्फोटात मरण पावलेले सुरक्षा कर्मचारीच आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्ण डबघाईला गेली असल्याचे संपूर्ण जग ओरडून सांगत असतानाही पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या अद्याप ते लक्षात येत नाही, हे त्या देशाच्या नागरिकांचे दुर्दैवच म्हणता येऊ शकते. अर्थात, त्यांच्याकरता दोन सांत्वनाचे शब्द बोलताना हे संकट आपल्या दारापाशी येऊन ठेपणार नाही ना, याचीही खबरदारी भारताला घ्यावी लागणार आहे. ती घेण्याची हीच वेळ आहे. कारण म्हणतात ना, शेजारच्यास ठेच लागली तर आपण ठेच लागण्याची वाट पाहायची नसते.
आज पाकिस्तान चारही बाजूंनी संकटांनी घेरला गेल्यासारखे दिसते आहे. त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दृष्टिपथात नाही. दिवाळखोरीची भीती व्यक्त केली जाते आहे. जागतिक नाणेनिधीच्या लोकांनी अलीकडेच पाकिस्तानचा दौरा केला. मदतीचा हात देण्यासाठी ज्या अटी शाहबाज शरीफ यांच्या सरकारपुढे ठेवल्या आहेत, त्या अत्यंत कठीण आहेत. त्या स्वीकारल्या तर शरीफ यांना सरकारच पणाला लावावे लागेल. त्यातून तगण्याची सूतराम शक्यता नाही. श्रीलंकेत जे राजपक्षे घराण्याचे झाले ते पाकिस्तानात शरीफ बंधूंचे होण्याची शक्यता अधिक. मूळचे हे घराणे उद्योजकांचे. पण देशाचेच आरोग्य बिघडल्यावर ते काही चमत्कार करू शकत नाहीत. जगातल्या कोणत्याही नेत्याकडे अशी जादूची कांडी नाही की जी एका रात्रीत देशाचे आर्थिक चित्र बदलू शकते. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि मुख्य म्हणजे संयम परीक्षा घेणारा असतो. ती वेळ आता गेली आहे.आता परीक्षेचा काळ अगोदरच सुरू झाला आहे. भीषण आर्थिक आणि राजकीय संकटात सापडल्यावरही पाकिस्तानातील शहाण्यांच्या डोक्यात अद्याप प्रकाश पडलेला नाही.
त्या देशात “डॉन’ नावाचे एक अग्रगण्य माध्यम आहे. “डॉन’ने एका वाक्यातच पाकिस्तानातील आजचे वास्तव जगासमोर मांडले आहे. ते भयावह आहे. पाकिस्तान निराशेच्या इतक्या गर्तेत गेला आहे की, लोक आता सामानाची बांधाबांध करून देश सोडून जाण्याच्या मानसिकतेत पोहोचले असल्याचे “डॉन’ने म्हटले आहे. देशाची ही जी अवस्था झाली आहे त्यात पाकिस्तानच्या राजकारण्यांचा वाटा आहेच, मात्र स्वत:ला शक्तिमान आणि पाकिस्तानचे तारणहार समजणाऱ्या लष्कराचाही वाटा आहे. किंबहुना परस्परांवर कुरघोडी करण्याच्या आणि भारताच्या विरोधात कोण जास्त विष ओकते या स्पर्धेच्या खटाटोपात पाकिस्तान पार रसातळाला गेल्याचे भान त्यांना अजूनही नाही.
त्यांची अंतर्गत भांडणे सुरूच आहेत. त्यांच्या या वृत्तीमुळेच पाकिस्तानची सर्वसामान्य जनता अधिकच गरिबीच्या दरीत ढकलली जाते आहे. सामान्यत: अशा अस्थिर आणि आपद्प्रसंगी काही मंडळी दु:ख करत न बसता आपली पोळी कशी भाजता येईल यावर लक्ष केंद्रित करतात. तसा एक गट पाकिस्तानात पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. हा गट आहे धार्मिक कट्टरवाद्यांचा. त्यांची ताकद या काळात कुठेतरी वाढत चालली आहे. ती केवळ पाकिस्तानसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी आणि विशेषत: भारतासाठी धोकादायक आहे.
भारतासाठी त्रासदायक का?
भारत आणि पाकिस्तान हे केवळ भूभागानेच नाही तर नशिबानेही परस्परांशी जोडले गेले आहेत. मुळात 1947 च्या अगोदरपर्यंत हा संपूर्ण भूभागच अर्थात हे दोन्ही देश एकच होते. तोच भारताला शाप आहे. कारण एकीकडे खोल विहीर तर दुसरीकडे दरी अशा स्थितीत पाकिस्तान पोहोचला आहे. ही स्थिती एकेकाळी पूर्व पाकिस्तानात (आजचा बांगलादेश) निर्माण झाली होती. देशात साधनसंपत्ती कमी पडू लागली, सुविधा पुरेनाशा झाल्या, राजकीय नेतृत्वाला त्याचे सोयरसूतक नसल्याचे जाणवू लागले, त्यात अत्याचारांनी सीमा गाठली अशी असहनीय अवस्था झाल्यावर पूर्व पाकिस्तानातील लोक त्याच मानसिकतेत गेले ज्या मानसिकतेत आता “डॉन’च्या म्हणण्यानुसार संपूर्ण पाकिस्तानातील लोक जाऊ लागले आहेत. तेव्हा लाखोंच्या संख्येने पूर्व पाकिस्तानातील लोक भारताच्या आश्रयाला आले होते.
आता पुन्हा तसे होणार नाही असे म्हणणे किंवा मानणे भाबडेपणाचे ठरेल. स्थिर आणि कथित लोकशाही असलेला पाकिस्तान कायमच जगाची डोकेदुखी ठरला होता. भारतासाठी तर शेजारच्या घरात अजगर पाळल्यासारखी स्थिती आहे. त्या घराचा मालक जर त्या अजगराला सांभाळू शकत नसेल तर तो मालकाला हजम केल्यानंतर शेजाऱ्याला विळखा घालू शकतो. पाकिस्तानातील अराजक भारतासाठी त्यामुळेच धोक्याचे आहे. त्यांच्या पलीकडे अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आहे. त्यांना जगाच्या कायदेकानूनशी काही देणेघेणे नाही. पाकिस्तानने अफगाणमधील या दहशतवादाच्या भस्मासूराला खतपाणी दिलेच, पण बरेच आपल्याही आश्रयाला ठेवले. जेव्हा देश नावाची व्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत येऊन ठेपते त्यावेळी या शक्ती अनियंत्रित होत असतात आणि आपले ध्येय गाठण्यासाठी सज्ज होतात. त्यांचे ध्येय काय आहे ते वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बरे प्रश्न केवळ दहशतवाद्यांचा किंवा जिहादींचा नाही. पाकिस्तान आज एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे.
मानवतेचा सर्वाधिक घात करण्याची क्षमता असलेले हे अस्त्र त्यांच्याकडे आहे व त्याबद्दल अमेरिकेसारख्या देशानेही गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून चिंता व्यक्त केली आहे. आताच्या स्थितीत जर पाकिस्तानची कथित व्यवस्था आपली ही शस्त्रे सांभाळण्यात अपयशी ठरली, तर त्याचे महाभयंकर परिणाम होतील, हे निश्चित.
पाकिस्तानची वाटचाल पाषाण युगाच्या दिशेने सुरू झाली आहे का, अशी भीती आता त्या देशातील जाणकारच व्यक्त करताना दिसत आहेत. थोडक्यात, सीमेवर येण्याची शक्यता असलेले लोंढे ते त्या गर्दीतून येणारे दहशतवादी ते त्या देशाची अण्वस्त्रे हाती लागलेले माथेफिरू असे तिहेरी संकट भारताच्या दाराशी येऊन ठेपणार आहे. हे संकट तत्कालिक नसेल तर दीर्घकाळासाठी असेल. शिवाय एखाद्या हॉलीवूड पटाप्रमाणे दोन तासांत त्याचा सोक्षमोक्षही लागणार नाही. त्यातून बाहेर यायला अनेक दशके आणि काही पिढ्याही खपतील. ते जर होऊ द्यायचे नसेल तर आताच सावध राहण्याची गरज आहे.
अभिजीत गोडबोले