मार्केटयार्ड – वाहतुकीतून नागरिकांना सुरक्षित चालता यावे, यासाठी पदपथ असतात. त्यावर अतिक्रमण होऊ नये, याबाबत न्यायालयाने सुद्धा अनेक निकालात नमूद केलेले आहे. तर, सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या मार्केटयार्ड भागात कृषी उत्पन्न बाजार समितीने पदपथच चक्क लोखंडकेी जाळीने बंदिस्त केले आहेत.
शहरात सोमवारी पादचारी दिन साजरा करण्यात आला. तर, दुसऱ्या बाजूला पादचारी मार्ग बंद असल्याचे दिसून आले. मार्केट यार्ड येथील शिवनेरी पथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचा आहे. याची देखभाल मात्र महानगरपालिका करत आहे. तालेरा गार्डन, मनोज सोसायटी भागात सदर रस्त्यावर लोखंडी जाळी लावून बंद करण्यात आलेल्या पदपथावर अतिक्रमण झाले आहे. अनेक फिरस्त्या विक्रेत्यांनी येथे आपले संसारच थाटले आहेत.
“एकीकडे मनपाने लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद करून फक्त पादचाऱ्यांसाठी ठेवला आहे. दुसरीकडे शिवनेरी रस्त्यावर पदपथ लोखंडी जाळीने बंद केले आहेत. हा पदपथ खुला करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. या विषयात आयुक्तांनी स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे.-” – प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक