जामखेड – शहरातून जाणाऱ्या महामार्गाची कोणत्याही परिस्थितीत रूंदी कमी होणार नाही. जर या महामार्गाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा, अशी सक्त ताकीद खा. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांना दिली.
खा.विखे यांनी रविवारी जामखेड पंचायत समिती सभागृहात जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता दिलीप तारडे, उपअभियंता स्मिता पवार, प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार योगेश चंद्रे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी , राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभाप्रमुख प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, निखील घायतडक, नगरसेवक अमित चिंतामणी, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, संचालक सुधीर राळेभात, डाॅ.ज्ञानेश्वर झेंडे, ॲड. बंकट बारवकर, मकरंद काशीद, अशोक महारनवर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
खा. विखे म्हणाले, जामखेड शहराच्या विकासासाठी कोणतीही तडजोड होणार नाही. जर कोणीही कामात अडथळा आणला तर त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करा. रस्ता दर्जेदार झालाच पाहिजे. विंचरणा नदी पूल ते खर्डा चौक हा रस्ता प्राधान्याने अगोदर पूर्ण करावा . कारण हा रस्ता सर्वाधिक वाहतूकीचा असून, वेळ न दवडता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबधित अधिकारी व ठेकेदार यांना खा. विखे यांनी दिले.
प्रा.मधुकर राळेभात म्हणाले, या महामार्गाचे काम करताना दगड आणि मातीचाच जास्त वापर होत आहे. मुरुमाचा वापर दिसत नाही. धुळीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्तावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असून, लवकरात लवकर व वेळेत रस्ताचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.
टक्केवारी मागणार नसल्याने काम दर्जेदार करा
राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित ठेकेदाराला धारेवर धरत खा. विखे यांनी, तुमचे नशीब चांगले आहे. तुम्हाला खासदार आर्थिकदृष्टय़ा सक्षम मिळाला आहे. तुम्हाला कोणीही टक्केवारी मागणार नाही. म्हणून काम दर्जेदारच झाले पाहिजे. त्याच्यात कोणतीही तडजोड खपून घेणार नसल्याचा इशारा दिला.
अवकाळीच्या नुकसानीचा आढावा नाही.
खा.विखे आजच्या आढावा बैठकीत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आणि ३० नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार होते .मात्र, या बैठकीत केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेऊन, शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या अवकाळी पावसाने झालेल्या पिक नुकसानीचा आढावा घेतला गेला नाही.