पुणे –गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या तसेच मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका जूननंतर कोणत्याही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी कोण आघाड्या आणि युती करणार आणि कोण स्वबळाचा नारा देणार या चर्चांना जोर आला आहे.
पालिका निवडणुका दिवाळीनंतर होतील, असे चित्र निर्माण झाल्याने काहीशा सुस्तावलेल्या सर्वच राजकीय पक्ष पुनश्च: हरिओमचा नारा देत पालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज असले तरी सत्ता सोपान चढण्यासाठी 2017 मध्ये महापालिकेत विक्रमी जागा मिळवित सत्तेवर असलेल्या भाजपला तगडा सामना द्यावा लागणार आहे. त्यामुळे पुण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच राष्ट्रवादी-शिवसेना आणि कॉंग्रेसला आघाडीत लढण्यास अनुकूल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजप मराठीचा नारा मागे ठेवत हिंदूत्वाचा झेंडा खाद्यांवर घेऊन नव्या प्रवासाला निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेसोबत युती होण्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. भाजप आणि मनसेचा राजकीय शत्रू महाविकास आघाडीच असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याने हे दोन्ही पक्ष पुण्यात महापालिकेत एकत्र येतील, असा होरा बांधला जात आहे. तर, दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळविणारा आपचा “झाडू’ पुण्यातील निवडणुकांच्या रिंगणात जोरदार धुराळा उडवेल, असे बोलले जात आहे.
आघाडी की बिघाडी?
पुणे महापालिकेची मुदत 14 मार्च 2022 रोजी संपली असल्याने निवडणूक आयोगाकडून नोव्हेंबर 2021 पासूनच निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, त्याचवेळी ओबीसी आरक्षणाच्या सुनावण्या सुरू असल्याने ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. मात्र, तरीही निवडणुका वेळेतच होतील असे चित्र होते. परिणामी पुण्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्याही सुरू झाल्या आणि आघाडीच्या प्राथमिक निर्णय या सर्वांनी आपल्या वरिष्ठांना कळविला. मात्र, त्याचवेळी कॉंग्रेस नेत्यांकडून राज्यात स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात करण्यात आली. तर, दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा विरोध डावलत “पीएमआरडीए’ निवडणुकीसाठी उमेदवार दिल्याने आघाडीत चांगलाच वाद पेटला. मात्र, त्यानंतर करोना संकट आणि प्रभागरचनेचे काम मागे पडल्याने आणि नंतर राज्य शासनाने निवडणूक अधिकार कायदा करून आपल्याकडे घेतल्याने निवडणुका पुढे गेल्या. त्यामुळे आघाडीची चर्चा थांबली होती. मात्र, न्यायालयाचा निकाल येताच हे तीनही पक्ष पुन्हा सक्रिय झाले असून शहराध्यक्षांनी एकमेकांशी संपर्क साधत चर्चा सुरू केली आहे.
आपचा “झाडू’ राजकीय धुरळा उडविणार?
महापालिका निवडणुकांसाठी आघाडी आणि युतीच्या चर्चेच्या जोर धरत असताना; दिल्ली पाठोपाठ पंजाब विधानसभेवर झेंडा फडकविणाऱ्या आपचा झाडू पुण्यात राजकीय धुरळा उडविण्यासाठी सज्ज आहे. पंजाबच्या निकालानंतर आपली शहर कार्यकारीणी आणि पदाधिकारी सक्रिय झाले असून मोठ्या प्रमाणात युवक आणि उच्चशिक्षित वर्ग आपला जोडला जात आहे. पक्षाकडून शहरात स्वबळावर आणि महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढविण्याचा नारा देण्यात आला आहे. त्यामुळे, आपही या निवडणुकीत रंगत भरणार असल्याची चर्चा आहे.
भाजप-मनसे युती
महापालिकेत सत्ताधारी भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्र येत असतानाच; आता भाजप-मनसे युतीच्या वावड्या उठण्यास सुरुवात झाली आहे. मनसेकडून राज्यभरात मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. या भूमिकेला भाजपने सरळसरळ पाठींबा दिला नसला तरी मनसेच्या आडून थेट शासनावर आणि शिवसेनेच्या हिंदूत्वावर प्रश्न उपस्थित करत आहे. त्यातच, काही महिन्यांपूर्वी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून महापालिकेत मनसेला पुन्हा आपला डंका वाजवायचा असेल तर भाजपसोबत युती आवश्यक असल्याचे जाहीरपणे सांगितले होते; तर भाजप नेत्यांनीही त्याला नकार न देता कोणासोबतही युती होऊ शकते, असे सूचित केले होते. मात्र, आता राज्यात मनसेच्या या आंदोलनामुळे असलेली स्थिती लक्षात घेता एकाच रस्त्याने निघालेल्या भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना जोर आला आहे.