बेल्हे – यावर्षी अणे पठारावर पाण्याची परिस्थिती गंभीर असून कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अणे पठार भागात 8 ते 9 हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन असून शेतीसाठी कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना राबविण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी असून लोकप्रतिनिधींनी आता तरी पुढाकार घेऊन पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अणे (ता. जुन्नर) पठारावरील शेतीला उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी मिळावे, अशी मागणी अणे पठारावरील शेतकरी अनेक वर्षांपासून करीत आहेत; परंतु शासनाचा या मागणीला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी अणे पठार विकास संस्थेच्या माध्यमातून रविवारी (दि. 29) झालेल्या बैठकीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पठारावरील अणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा व आनंदवाडी येथील शेतकऱ्यांची पाणी प्रश्नाबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत संपूर्ण अणे पठारावर उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी ठराव संमत करून सह्यांचे निवेदन तयार करण्यात आले. यावेळी अणे पठारावरील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
अणे पठारावरील शेती समृद्ध करण्यासाठी नवीन सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) मध्ये आणे पठाराचा समावेश करून लवकरात लवकर उपसा सिंचन योजना राबवावी. तसेच जोपर्यंत अणे पठारावर पाणी येत नाही तोपर्यंत पारनेर तालुक्याला लागू असलेल्या सर्व योजना, सुविधा व सवलती आणे पठाराला लागू करण्यात याव्यात. कारण अणे पठार जरी सुजलाम सुफलाम अशा जुन्नर तालुक्यात असला तरी येथील भौगोलिक परिस्थिती पारनेर तालुक्या सारखीच आहे.
असे देवस्थान संस्थेचे माजी अध्यक्ष विनायक आहेर यांनी सांगितले. यावेळी पेमदरा गावचे उपसरपंच व भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुका प्रमुख बाळासाहेब दाते, शिंदेवाडीचे माजी सरपंच एम. डी. पाटील, अणे गावच्या सरपंच प्रियांका दाते, पेमदरा गावचे माजी सरपंच विठ्ठल बेलकर, देवस्थान संस्थेचे अध्यक्ष व पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते, मुक्ता दाते, विजयकुमार आहेर, जयराम दाते यांनी आपले विचार मांडले. सभेचे सूत्रसंचालन तुषार आहेर यांनी केले.
धरण उशाला कोरड घशाला
जुन्नर तालुक्यात पाच धरण असून तालुक्यातील सर्व जनतेला पाणी मिळत नाही. तर कुकडी प्रकल्पातून नगरच्या पारनेर, श्रीगोंदा जामखेडपर्यंत जनतेची तहान भागविली जात असून शेतजमिनीही ओलिताखाली आल्या आहेत; मात्र अणे पठार भागाला कुकडी प्रकल्पातून शेतीच्या पाण्यासाठी वंचित ठेऊन दुजाभावाची वागणूक मिळत असल्याची नागरिकांची भावना असून दि. 16 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अणे पठारावरील सर्व शेतकरी व व्यावसायिकांनासोबत घेऊन दि. 16 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनास शासनाचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यास मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे.
– मधुकर दाते, कार्याध्यक्ष, अणे पठार विकास संस्था
अणे पठारावरील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपले राजकीय व वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.
– बाळासाहेब दाते, भारतीय किसान संघ, जुन्नर तालुका प्रमुख