लोणंद – लोणंद शहरातील पाणी समस्या अत्यंत बिकट झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने लोणंदमधील संतप्त नागरिकांकडून शास्त्री चौक परिसरात रस्तारोको आंदोलन करण्यात आले. लोणंद नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लोणंदकरांना सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
लोणंद शहरातील अनेक प्रभागात पाणीपुरठा होत नसल्याने टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरठा करावा लागत आहे. मात्र टॅंकरनेही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांकडून सोमवारी (दि. 30 रोजी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शास्त्रीचौक परिसरात लोणंद-सातारा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी नगर पंचायतीसमोर जावून त्याठिकाणी निदर्शन केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता श्रद्धा गर्जे यांनी ताबडतोब संबंधितांना पाण्यासाठी टॅंकर पाठवण्याची व्यवस्था केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी प्रभाग 15 मधील नाना जाधव, दशरथ जाधव, राजू जाधव, सुभाष पवार, सुनील जाधव तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. दरम्यान, यावेळी खंडाळा तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांनी लोणंद शहरातील पाणी समस्येवर बोलताना खंडाळा तालुक्याच्या पाणी प्रश्नावर बोलणारांना लोणंदमधील गल्लीतील पाणीप्रश्न सोडवता येत नसल्याची टिका केली.
टाकीतच पाणी नाही तर येणार कुठून
लोणंद शहरातील पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पाणीटंचाईबाबत नगरपंचायतीचे पाणी पुरवठा सभापती भरत बोडरे यांना विचारणा केली असता त्यांनी “टाकीतच नाही तर द्यायचं कुठून?’ असा सवाल करत सध्या लोणंदला पाणीपुरवठा होत असलेल्या नीरा नदी येथील जॅकवेलच्या विद्युत पुरवठ्यात समस्या येत असल्याने अधिक क्षमतेचे पंप कार्यान्वित होत नसल्याने लोणंद शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे सांगितले.
भरत बोडरे,पाणीपुरवठा सभापती