नारायणगाव – अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्यांचा हातातून अशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकारने प्रारंभिक तातडीची आर्थिक मदत करावी व कृषी व महसूल विभागाला पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश द्यावेत, खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
एकामागून एक येणार्या सततच्या संकटांमुळे शेतकरी अगोदरच उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच रविवारी (दि. 26) पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ऊस, द्राक्ष, बटाटा, कांद्यासह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया होईपर्यंत न थांबता शेतकर्यांना प्रारंभिक नुकसानभरपाई देण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी भागातील अनेक शेतकर्यांनी पीक विमा काढलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शासनाने प्राथमिक पाहणी करून मदत करणे आवश्यक आहे. विमा कंपन्यांकडून शेतकर्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षताही राज्य सरकारने घ्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.