गावात विविध कामांचे भूमिपूजन
बारामती/जळोची – पुरंदर उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या तरडोली पाझर तलाव जोड प्रकल्पामुळे तरडोली परिसरातील शेतीला पाणी मिळून ते शेतीसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भोईटेवाडी येथे सुरू केलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना अंतर्गत तरडोली पाइपलाइन जोडप्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, सा. बां. पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता सा.बां. (वैद्यकीय) रामसेवक मुखेकर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सिद्धार्थ इंगळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक संभाजी होळकर, सोमेश्वर जिल्हा परिषद व्यवस्थापन समितीचे सदस्य हनुमंत भापकर, सरपंच विद्या भापकर आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, 1 किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमुळे तरडोली परिसरातील शेतीच्या पाण्याची मागणी कमी होणार आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या कालावधीत या तलावातील पाणी उपयोगी पडेल. जिल्हा परिषद आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 114 गाळमुक्त लघु पाटबंधारे प्रकल्प योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
हे प्रकल्प उपयुक्त ठरणार असून शेतीला पुरेसे पाणी मिळेल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तरडोली येथील 25 लाख रुपयांच्या समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.