पुणे मतदारसंघातून लढण्याचा प्रस्ताव आल्याने आढळराव पाटील समर्थक नाराज
रमेश जाधव
रांजणी – आगामी लोकसभा निवडणुकीला अद्यापही दोन वर्षांचा कालखंड आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेनेतील लोकप्रिय नेते आहेत; परंतु पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आढळराव पाटील यांच्यापुढे ठेवला आहे. त्यामुळे साहजिकच शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारी आघाडीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.
अर्थात राऊत यांनी आढळरावांपुढे ठेवलेल्या प्रस्तावाने आढळराव पाटील यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे अजूनही शिवसेना ही राष्ट्रवादीचेच ऐकत आहे की काय, ही भावना सामान्य शिवसैनिकांमध्ये आहे. ही ऑफर शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनाही रुचलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय भूकंप झाल्यास संजय राऊत यांनी आढळरावांच्या खासदारकीच्या उमेदवारीबाबत जो प्रस्ताव ठेवला. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही आढळराव पाटील यांना गेल्या काही महिन्यापासून पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आग्रह करत आहोत.
मात्र त्यांनी अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यांची लोकप्रियता पाहता आम्हाला खात्री आहे की ते पुणेची जागा जिंकतील; मात्र खासदार राऊत यांच्या प्रस्तावाने आढळराव पाटील नाराज झाले आहेत. डॉ. अमोल कोल्हे हे खासदार म्हणून आघाडी सरकार मधील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नेतृत्व करत आहेत. त्यामुळे भविष्यात शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी डॉ. अमोल कोल्हे यांना मिळण्याचे संकेत आत्तापासूनच मिळू लागल्याने शिवसेनेचे आढळराव पाटील समर्थक नाराज झाल्याचे देखील दिसून येत आहे.
शिवसेना उपनेते म्हणून सध्या कार्यरत असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदार संघात 2019 साली पराभूत झाले. तरीही न खचत शिरूरमध्ये पुन्हा चांगल्या प्रकारचे राजकीय वलय निर्माण केले. दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे पेरणी एका ठिकाणी करायची अन् खाणार दुसरे असा प्रकार येथे पाहायला मिळत आहे.
राऊत यांच्यामुळे शिवसेनेत दुफळी?
शिवसेनेत राजकीय दुफळी निर्माण करण्यात खासदार संजय राऊतच कारणीभूत असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा शिवसेनेच्या इतर नेत्यांनी केला आहे. किंबहुना शिंदे गटाचेही हेच म्हणणे आहे. त्यातच आता राऊत यांनी आढळराव यांच्या खासदारकी संदर्भात पुणे शहरातून लोकसभा लढवण्याबाबतचा जो प्रस्ताव आढळरावांपुढे ठेवला. त्या पार्श्वभूमीवर स्वतः आढळराव पाटील देखील खासदार राऊत यांच्यावर नाराज झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
हकालपट्टी नाट्यानंतर पुन्हा दिलजमाई
मुळातच शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील यांचे मोठे राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे पुणे शहर मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवतील ही शक्यता जाणकारांनी फेटाळून लावली आहे. आढळराव पाटील हे शिवसेनेचे वजनदार नेते असून राऊत यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. जर असं झालं तर उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच आढळराव पाटील मुंबईला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटून आले होते. आणि शिवसेनेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्टही केले होते.