पिंपरी – पावसाळ्यात नदीच्या पाण्याला वेग असल्याने जलपर्णी, फेस अशा बाबी नदीपात्रात दिसून येत नाहीत. परंतु तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी पावसाळ्यातही फेसाळलेली आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून रसायनमिश्रित सांडपाणी थेट सोडले जात असल्याने नदी फेसाळली आहे. तसेच पावसामुळे पाण्याची पातळीही वाढली आहे.
आळंदीत इंद्रायणी नदीतून नगरपरिषदेच्या पाणी साठवण बंधाऱ्यात प्रदूषित पाणी, जलपर्णी महापालिका हद्दीतून येत आहे. इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधाऱ्याचे अनेक ठिकाणी दगड निखळले आहेत. यामुळे गळती होत आहे. तसेच देखभाल दुरुस्ती अभावी नदीवरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात पाणी साठविण्यावर बंधारा गळतीने मर्यादा आली आहे. येथील बंधाऱ्यासह कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची गळती रोखण्यासह पाणीपुरवठा केंद्राकडील बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याची उपाययोजना करण्याची मागणी देखील भाविकांमधून होत आहे.
आळंदी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी व रसायन, मैला मिश्रित पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषण वाढले आहे. बुधवारी इंद्रायणी नदी रसायनमिश्रित पाण्यामुळे पुन्हा एकदा फेसाळल्याचे दिसून आहे.
त्यातून नदी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने दिसून येत आहे. वाढत्या जल प्रदूषणाने अलंकापुरीत भाविक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे नदीच्या प्रदुषणात वाढ झाली आहे. जल प्रदूषित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. नदीपात्रात अद्यापही जलपर्णी गेले दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, तरीही त्यात जलपर्णी अद्याप हटलेली नाही. तसेच रसायनमिश्रीत पाण्यामुळे नदी फेसाळत आहे. संबंधितांवर कारवाई करून नदीचे पाणी शुद्ध राहिल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नदीपात्रात अद्यापही जलपर्णी
गेले दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, तरीही त्यात जलपर्णी अद्याप हटलेली नाही. तसेच रसायनमिश्रीत पाण्यामुळे नदी फेसाळत आहे. संबंधितांवर कारवाई करून नदीचे पाणी शुद्ध राहिल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.