खेड तालुक्यात पावसाची दडी : सर्वाधिक 215 टक्के सोयाबीनची पेरणी
रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील शेती पिकांची पेरणी रखडली आहे. भात आगार असूनही केवळ 2 टक्केच पेरणी झाली असून भुईमूग 3, बटाटा 15 तर सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी 215 टक्के झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी यांनी दिली.
खेड तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक भात आणि सोयाबीन पीक घेतले जाते. बटाटा, भुईमूग आदी पिकांखाली क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. पावसाच्या परिमाणात होत असलेले बदल आणि बदलते हवामान यामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खरीप हंगामातील अनेक पिकांना तिलांजली देत सोयाबीन पिकाकडे वळला आहे.
त्यातही अनेक नैसर्गिक संकटे येत असल्याने शेती करणे शेतकऱ्यांना जिकिरीचे बनले आहे. तर अनेक तरुण वर्गाने शेतीकडे पाठ फिरवली असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती पडीक राहत आहे तर तालुक्याच्या काही भागात एमआयडीसी आणि सेझ आल्याने शेती क्षेत्रात कमालीची घट झाली आहे.
खेड तालुक्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, घेवडा, वाल हुलगा, मटकी, चवळी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, बटाटा, फुलपिके भाजीपाला व चारा पिके व इतर अनेक पिके घेतली जातात. तब्बल 35 हजार 764 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामात अनेक पिके घेतली जातात. मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पीक वगळता इतर पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत.
धरण परिसरातही अत्यल्प परिणाम
खेड तालुक्यात पावसाचे अत्यल्पप्रमाण असून त्याचा परिणाम खरीप हंगामावरील पेरणीवर झाला आहे. पाऊस नसल्याने पुण्याला शिरूर आणि खेड तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात पाहिजे तेवढी वाढ होत नाही. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भामा आसखेड, चासकमान धरण परिसरात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. तर अगदी दीड टीएमसी पाणी क्षमता असलेले कळमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी खेड तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे शेती उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.